बुलढाणा : स्त्रिया या अबला राहिल्या नसून त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, अनेक भूमिका बजावत, सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपण पाहिलं आहे. बुलडाणा शहरातील एका इंग्रजी शाळेत मुख्याध्यापक ते शिपाई अशी संपूर्ण धुरा महिला खंबीरपणे आणि जबाबदारीने सांभाळत आहेत. 


बुलडाणा शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षण घेता यावे, या उद्देशाने अतिशय कमी शुल्कामध्ये 1972 साली शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाल शिवाजी इंग्लिश कॉन्व्हेंट ही शाळा सुरु करण्यात आली. तेव्हापासून विद्यार्थ्यांना अविरत विद्यादानाचे कार्य या कॉन्व्हेंटच्या माध्यमातून केले जात आहे. तर गत काही वर्षांपासून या शाळेचे प्राचार्य, शिक्षिका ते शिपाई या सर्व पदांची जबाबदारी ही महिलांवर सोपवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी कार्यरत असलेल्या या संपूर्ण महिला, दिलेली जबाबदारी अतिशय सक्षमपणे बजावत आहेत. या शाळेमध्ये प्राचार्यापासून ते शिपाईपर्यंत एकूण बावीस कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यामध्ये सर्वच कर्मचारी या महिला आहेत. 


बुलडाणा जिल्ह्याला ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक असा सर्वच बाबतीत वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ आणि ताराबाई शिंदे यांच्या नावाने प्रामुख्याने हा जिल्हा ओळखला जातो. ज्या पद्धतीने माँसाहेब जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना घडवले, त्यांच्यावर संस्कार केले, तसंच सर्व महिला कर्मचारी आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.


महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले आहे, त्यामुळे सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये महिलांची 50 टक्के संख्या पाहायला मिळते. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील ही एकमेव शाळा आहे, जी पूर्णपणे महिला सांभाळत आहेत आणि तेही अतिशय चोखपणे. याच महिलाराज असलेल्या शाळेचा आपण एक भाग असल्याचा अभिमानही येथील महिला शिक्षिकांना वाटतो आणि त्यांच्यासोबत काम करताना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील आनंद होतो. 


खरंतर भारत हा पुरुष प्रधान संस्कृती असलेला देश. महिलांना पूर्वी दुय्यम दर्जा दिला जायचा, मात्र वेळोवेळी महिलांनी आपल्या सामर्थ्यशाली कर्तृत्वाच्या जोरावर आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे आणि वेळोवेळी स्वतःला सिद्ध करुन दाखवत आल्या आहेत. महिलांची सर्व क्षेत्रात प्रगती पाहून, महिला या अबला राहिलेल्या नाहीत हे दाखवून दिलं आहे. एकंदरीत जर पाहिलं तर, खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित झाल्याचे हे लक्षण म्हणावं लागेल.