मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर 'मास्क' लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, तरीही या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात मुंबई महापालिकेकडून कारवाई तीव्र आणि वेगवान करण्यात आली आहे. या अंतर्गत 01 ते 21 ऑक्टोबर 2020 दरम्यान 82 हजार 497 नागरिकांना प्रत्येकी 200 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्याकडून एकूण 1 कोटी 64 लाख 96 हजार 900 रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. कारवाई सुरु झाल्यापासून आतापर्यंतचा विचार करता एकूण 80 टक्के कारवाई ही मागील 21 दिवसांत झाली आहे.


'कोविड 19' च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेह-यावर 'मास्क' लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच 'मास्क'चा वापर न करणा-या नागरिकांवर रुपये 200 इतका दंड आकारण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने संपुष्टात येत असताना सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचा वावर वाढला आहे.


Mask Price | मास्क दरावर अखेर नियंत्रण, मास्कचे नवे दर 3 रुपये ते 127 रुपये


कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी ‘मास्क’चा वापर अत्यंत प्रभावी ठरत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी योग्यरित्या व सातत्याने ‘मास्क’चा वापर करावा, हा कारवाईमागील उद्देश आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून आता अधिकाधिक नागरिक 'फेसमास्क' वापरत आहेत.


मास्क न घातल्याने मुंबईत पहिल्या गुन्ह्याची नोंद, काय शिक्षा मिळणार?


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत असलेली विना 'मास्क' विषयक दंडात्मक कारवाई ही विभाग स्तरावर एप्रिल 2020 पासून नियमितपणे करण्यात येत आहे. दिनांक 9 एप्रिल ते 21 ऑक्टोबर 2020 दरम्यान 'मास्क' न लावता सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेल्या 1 लाख 752 नागरिकांकडून 2 कोटी 30 लाख 29 हजार 400 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.


दिनांक 1 ते 21 ऑक्टोबर 2020 या 21 दिवसांत एकूण 82 हजार 497 नागरिक विना मास्क आढळले. प्रत्येकी 200 याप्रमाणे त्यांच्याकडून 1 कोटी 64 लाख 96 हजार 900 इतकी रक्कम दंड स्वरुपात वसूल करण्यात आली आहे. आतापर्यंतचा विचार करता मागील 21 दिवसांत कारवाई झालेल्या नागरिकांची संख्या ही एकूण कारवाईच्या 82 टक्के आहे. तर, दंडापोटी मागील 21 दिवसांत वसूल केलेली रक्कम ही आतापर्यंतच्या एकूण रकमेच्या सुमारे 72 टक्के इतकी आहे.