Eknath Shinde In Kolhapur : सिद्धगिरी मठावर होत असलेल्या 'सुमंगलम'ने कोल्हापूरची जागतिक पातळीवर मान उंचावली जाईल, हा महोत्सव किर्तीमान करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पंचगंगा घाटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंचगंगेची आरती करण्यात आल्यानंतर 'सुमंगलम' महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना सिद्धगिरी मठाच्या कामाची प्रशंसा करत 'सुमंगलम' आयोजनात राज्य सरकारचा सक्रिय सहभाग राहील, अशी ग्वाही दिली.


दरम्यान, कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज यांनी सुमंगलम महोत्सव कसा असेल याची माहिती दिली. तसेच विविध पातळीवर कशा प्रकारे सहकार्य आवश्यक आहे, तसेच लोकांकडूनही सहकार्य कशा पद्धतीने घेता येईल याबाबत उहापोह केला. ते म्हणाले, महोत्सवासाठी स्वयंसेवक 10 हजार लागतील. चार लाख लोकांना जेवणाची सोय करायची आहे. महिलांकडून एक तास आणि ग्लास मागितला आहे जेणेकरून त्यांचा सहभाग वाढेल. मुख्यमंत्र्यांनी या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आहे. 


या कार्यक्रमाने कोल्हापूरची मान उंचावली जाईल


मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सिद्धगिरी मठ महोत्सवाचे व्यवस्थित नियोजन करेल यात शंका नाही. शासन स्तरावरून सर्व पूर्तता केली जाईल. मला पंचगंगेची आरती आणि महोत्सवाचे बोधचिन्ह अनावरण करण्याची संधी मिळाली, हा सगळ्यात मोठा आशीर्वाद समजतो. या कार्यक्रमाने कोल्हापूरची मान उंचावली जाईल. सिद्धगिरी मठाच्या टीमचा नियोजनात कोणीच हात धरू शकत नाही. आम्हालाही कमी वेळात जास्तीचा काम करण्याचा अनुभव आम्हाला आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी मठावर केलेल्या जात असलेल्या कार्याचा आढावा घेतला. ते पुढे म्हणाले, महाराजांमुळे आरती करण्याची संधी लाभली. कोल्हापूरला दक्षिण काशी म्हणून ओळखतात. पालकमंत्र्यांनी माझ्या कामाच्या पद्धतीचा उल्लेख करत अनुभव सांगितला, पण कोल्हापूरच्या महापुरात ती माझी जबाबदारी होती, गरज होती. त्यामुळे 15 दिवस थांबावं लागलं. जिथं काम करतो तिथं कार्यकर्ता म्हणून काम करतो. 



महिनाभरात पंचगंगा घाट उजळलेला दिसेल 


दीपक केसरकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मला मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमध्ये काम करण्यासाठी म्हणून पाठवलं आहे. महापूर काळात एकनाथ शिंदे कोल्हापुरात होते. त्यांनी एकही साथीचा रोग येऊ दिला नाही. पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या नाल्यातील पाण्यांवर प्रक्रिया करण्यासाठी निधी दिला. मोदींशी चर्चा करून त्यांनी 12 हजार कोटी मंजूर केले आहेत. कोल्हापूरच्या रस्त्यांसाठी 100 कोटी जाहीर केले आहेत. त्या माध्यमातून क्राँकिटचे रस्ते केले जातील. महिनाभरात पंचगंगा घाट उजळलेला आपल्याला दिसेल. भव्य आरती रोज केली जाईल. या माध्यमातून महिलांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. अंबाबाई मंदिर परिसरातील सर्व सरकारी कार्यालये हलवली असून इमारती शासनाच्या ताब्यात येतील व त्या ठिकाणी भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. 


इतर महत्वाच्या बातम्या