मुंबई : खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची उद्या (27 जून) पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक आहे. या बैठकीत सरकारमधून बाहेर पडण्यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकालपट्टी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.


सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कार्यकारिणी बैठकीत घेतल्यास सदाभाऊ खोत यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते असलेले सदाभाऊ खोत हे राज्य मंत्रिमंडळात कृषी राज्यमंत्री आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन खासदार राजू शेट्टी यांनी कायमच सरकारविरोधी भूमिका घेतली आणि उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राजू शेट्टी हे सरकारमध्ये राहण्यास उत्सुक नाहीत, हे गेल्या काही दिवसांतील त्यांच्या वक्तव्यांवरुन स्पष्ट आहे. मात्र, उद्याच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला जातो का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, कर्जमाफीचा मुद्दा असो वा तूर खरेदीचा मुद्दा असो, खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत या एकाच संघटनेतील दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये वाद निर्माण झाले होते. या सर्वच गोष्टींमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यातील उद्याची कार्यकारिणीची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.