औरंगाबाद : महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुस्लिम बांधवांना बकरी ईद प्रतिकात्मकरित्या साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. त्यासाठी सरकारने काही नियमावली दिली. मात्र ही नियमावली एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना मान्य नाहीत. खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेत. बकरी ईदच का प्रतिकात्मक साजरी करायची? असा सवाल केला आहे. त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अयोध्येतील राम मंदिराचं प्रतिकात्मक भूमिपूजन करावं, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. यावर जलील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने प्रसिद्धी पत्रक काढून केली आहे.


देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून गेल्या काही महिन्यांपासून सण साध्या पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. राज्य सरकारनं गणेश उत्सव आणि बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात एक परिपत्रक काढून नियमावली दिले आहे मात्र हीच नियमावलीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आक्षेप घेत. बकरी खरेदीच्या ऑनलाइन प्रक्रियेला विरोध केला आहे. बकरी ईदच का प्रतिकात्मक साजरी करायची? असा सवाल करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अयोध्येतील राम मंदिराचं प्रतिकात्मक भूमिपूजन करावं, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. तर जलील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.



इम्तियाज जलील यांनी एबीपी माझाशी बोलताना हा सवाल केला. यावेळी त्यांनी बकरी खरेदीच्या ऑनलाइन प्रक्रियेलाही विरोध केला. श्रीमंतांकडे स्मार्ट फोन आहेत. ते लोक ऑनलाइन पद्धतीने बकऱ्यांची खरेदी विक्री करू शकतात. पण खेड्यापाड्यातील गरीब शेतकऱ्यांनी काय करायचे? शेतकऱ्यांकडे महागडे फोन नसतात. अनेक शेतकऱ्यांकडे तर साधेही फोन नाहीत, मग त्यांनी बकऱ्यांची ऑनलाइन खरेदी विक्री करावी कशी? शिवाय शेतकऱ्यांकडे एक-दोन बकरे असतात, त्यासाठी त्यांनी फोन खरेदी करायचे का? असा सवाल करतानाच शासनाची बकरे खरेदीची ऑनलाइन प्रक्रिया अमान्य असल्याचं जलील म्हणाले. सरकारने बकरी ईद साध्या पद्धतीने आणि प्रतिकात्मक साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. बकरी ईद प्रतिकात्मक साजरी करायची आहे तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 5 ऑगस्ट रोजी होणारं राम मंदिराचं भूमिपूजन प्रतिकात्मकरित्या साजरं करावं, सर्व नियम आम्हालाच का? असा सवालही त्यांनी केला आहे.


जलील यांच्या या वक्तव्याला विश्व हिंदू परिषदेने आक्षेप


जलील यांनी केलेल्या वक्तव्याचा विश्व हिंदू परिषदेने निषेध केला आहे. विश्व हिंदू परिषदेने एक परिपत्रक काढून केलेली यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जलील यांचं विधान सामाजिक तेढ निर्माण करणारं आणि बेजबाबदारपणाचं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विहिंपने केली आहे. त्यामुळे बकरी ईदच्या मुद्द्यावरून एमआयएम आणि विहिंपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.


औरंगाबादचे महापालिका प्रशासक पांडेय यांनी बकरी ईदनिमित्त मार्गदर्शक सूचना


औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. रोज 300 पेक्षा अधिक रुग्ण कोरोना बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे सध्याच्या स्थितीत सगळ्या धार्मिक कार्यक्रमाला राज्यात बंदी आहे. त्यामुळे नागरिकांनी बकरी ईद घरीच साजरी करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. मशिद, दर्गाह किंवा सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करू नये ,असं देखील महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. जनावरांचे बाजार बंद असतील, त्यात कुठलीही शिथिलता मिळणार नाही. नागरिकांना जनावरे खरेदी करायचे असतील त्यांनी ऑनलाइन पद्धतीने किंवा दूरध्वनी वरूनच करावेत. नागरिकांनी शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी द्यावी.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.