UPDATE : नवी मुंबईतील प्रसिद्ध स्वराज बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे मालक राज कंदारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कंदारी यांनी सोमवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सानपाडा येथील राहत्या घरी त्यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी घातली. जखमी अवस्थेत त्यांना वाशीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.


 

 

नवी मुंबई : एक सामान्य फोटोग्राफर... ते सक्सेसफुल्ल बिल्डर... राज कंदारी यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.. मात्र करिअरचा आलेख चढता असलेल्या या बिल्डरने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हा प्रश्न उपस्थित होतो.

 
मूळचे ग्वाल्हेरचे कंदारी कोपरखैरणेत आले. फोटोग्राफीतून करियर सुरु केलेल्या कंदारी यांनी 15 वर्षांपूर्वी रियल इस्टेटमध्ये प्रवेश केला. छोट्या-मोठ्या दलालीतून ते बांधकाम व्यवसायात आले आणि 1998 मध्ये स्वराज बिल्डर्स अँड डेव्हपर्सची सुरुवात केली.

 
आधी छोट्या मोठ्या इमारतींपासून सुरु केलेल्या कंदारी हळूहळू मोठ्या इमारती बांधू लागले.

 
स्वराज किंग्स्टन- उलवे

स्वराज लगूना- नवे पनवेल

स्वराज डॅफोडिल्स- ऐरोली

स्वराज क्विन्स बे- कोपरखैरणे

स्वराज प्लॅनेट- कोपरखैरणे

स्वराज राज उदय- सानपाडा

 

असे कोट्यवधींचे 25 ते 30 मोठे प्रकल्प कंदारी यांनी उभे केले. कोपर खैरणेतली स्वराज क्वीन्स ही इमारत एकेकाळी नवी मुंबईतली 31 मजल्यांची सर्वात उंच इमारत होती. त्यांची उलाढाल जवळपास 500 ते 600 कोटींवर गेली होती. पण मग इतकं सगळं चांगलं असताना
नक्की बिनसलं कुठे, हा प्रश्न कायम राहतो.

 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या पनवेलमधल्या 50 एकर जागेत राज कंदारी यांना स्वराज लगूना हा प्रकल्प सुरु केला होता. त्यांच्या परवानग्यांसाठी त्यांनी लाखो रुपये खर्ची घातले होते. पण परवानगी अंतिम टप्प्यात असताना या जागेवर नैना सिटीचं क्षेत्र घोषित झालं.
सिडकोकडून होणारी दिरंगाई यामुळे राज कंदारी अस्वस्थ होते. इतकंच नाही, तर त्यांचे काही अधिकाऱ्यांशी वादही झाले होते.

 
आधीच मंदी, त्यात सरकारी बाबूंची खाबूगिरी यामुळे बिल्डरांची अवस्था बिकट झाली आहे.  सूरज परमार यांच्यानंतर आता राज कंदारी हे त्याचेच परिणाम आहेत.


संबंंधित बातम्या :


नवी मुंबईत बिल्डर राज कंदारी यांचा आत्महत्येचा प्रयत्न