पुणे : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल गेल्या आठवड्यात लागला. पण दहावीचा निकाल अजून लागलेला नाही. दहावीच्या निकालाची आता विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता आहे. यावर्षी दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या काळात आयोजित करण्यात आली होती. दहावीचा शेवटचा भुगोलाचा पेपर होता. पण कोरोनाच्या वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे हा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला होता.


राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील हिंगोलीमध्ये बोलताना 31 जुलैपूर्वी दहावीचा निकाल लागेल, असं सांगितलं होतं. परंतु, अद्याप महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.


देशात 24 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका पोस्टामध्येच अडकून पडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं विभागीय मंडळांमध्ये संकलन हे एक मोठं आव्हान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळापुढे होतं. त्यातच दहावीचा भुगोलाचा पेपर न झाल्यामुळे विषयांचं गुणदान कसं करायचं, हा एक मोठा प्रश्न मंडळापुढे होता. अखेर त्याचाही निर्णय झाला.


बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं रुपांतर हे रद्द झालेल्या भुगोल पेपरच्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं जाहीर झालं आहे. यामुळे दहावीच्या गुणदानाचा तिढा सुटला आहे. यामुळे आता दहावीचा निकाल कधी लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थीनी होत्या. राज्यातील एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती, तर 4979 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. मागच्या वर्षी 8 जूनला दहावीचा निकाल लागला होता. यावर्षी हा निकाल कधी लागतो याची सर्वांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या