राज्यात सध्या जोरदार पावसाची हजेरी लागत असून गावखेड्यात नदी, नाले दुथडीभरून वाहू लागले आहेत. त्यातच वेगवेगळ्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्याने शेतांसह गावात पूरपरिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी काय करावं? काय करू नये? 


सध्या विविध भागांमध्ये अतिवृष्टीमुळे तसेच धरणविसर्गामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत असून या पूरातून वाट काढत अनेकजण जाताना दिसतात किंवा नको ते धाडस करून जीव गमावताना दिसतात. अनेक भागात पूलावर पाणी आल्याने दुचाकी घेऊन पूल ओलांडताना अनेकजण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना ताज्या असताना पूर परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये यासाठी कृषी हवामान खात्याने काही सूचना दिल्या आहेत.


काय काळजी घ्यावी ?


■ गावात पूरस्थिती निर्माण झाल्यास अथवा होण्याची शक्यता असल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्त्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. वीज उपकरणांचा वीजपुरवठा बंद करावा. 


■ गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.


■ पूरस्थितीत उंच ठिकाणी जावे. पूरस्थिती असेपर्यंत पाळीव प्राणी, जनावरे उंच ठिकाणी बांधावीत. पाळीव प्राणी, इतर जनावरे यांना नदीकाठी, ओढ्याकाठी बांधू नये.


■ पुरामध्ये कोणी अडचणीत सापडला असेल तर पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे इम, दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करावा.


काय करू नये?


■ पूर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण फिरू नये. पूर आल्यानंतर पुलावरून वाहन नेण्याचा अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. विद्युत तारांना स्पर्श करू नये. पूरपरिस्थितीत नदी, नाले, पूल, धरण आदी ठिकाणी विनाकारण गर्दी करू नये.


शेतकऱ्यांनी काय करावे?


■ जनावरे सुरक्षित शेड मध्ये ठेवा व सुरक्षिततेची काळजी घ्या.


■ जनावरांना शुद्ध पिण्याचे पाणी द्या.


■ पूर प्रवण क्षेत्रात पाण्यात बुडणाऱ्या पिकांच्या वाणाची निवड करा.


■ पूरानंतर शेतातील जादा पाणी काढून टाका.


■ अतिपूरग्रस्त भागात कमी कालावधीत येणारी तांदळाच्या वाणांची नर्सरी वाढविण्यासाठी उंचावरील जमीन निवडा. पुराचे पाणी कमी झाल्यावर शेतकरी त्याचे रोप लावण्याचे काम करू शकतात.


■ मुख्य शेतात भाताच्या पिकाचे किंवा रोपांचे नुकसान झाल्यास जास्त कालावधीच्या रोपांचे उशीरा लागवड करावी. पुराग्रस्थ भागात पाण्याखाली टिकून राहतील अशा वाणांच्या पिकांची निवड करावी.


■ उंचावरील जमिनीच्या परिस्थितीत अरहर आणि तीळ लागवडीसाठी निवडता येतात.


■ अतिवृष्टीचा अंदाज येताच परिपक्व पिकांची कापणी करा आणि काढणी केलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी ठेवा.


■ अर्धवट बाधित शेतात तांदळाच्या शेतातून जास्तीचे पाणी काढून टाकावे आणि पीक हे फुटवे च्या अवस्थेत असल्यास टोपड्रेसिंग म्हणून 1/3rd N2 + 50% K2O द्यावे.


■ पुरामुळे पिकांचे नुकसान झाल्यास सूर्य प्रकाशास असंवेदनशील व कमी कालावधीच्या भाताच्या वाणांची लागवड करावी.


■ जर पूर बियाणे वाहून गेले तर बियाण्याची वैकल्पिक व्यवस्था करा.


■ पुराचे पाणी कमी झाल्यानंतर पूरग्रस्त पिकांवर जास्त प्रमाणात नत्रयुक्तखते द्या.


काय करू नये?


■ कापणी केलेली पिके खुल्या शेतात सोडू नका.


■ शेतात जास्त काळ पाणी साचू देऊ नका, कारण यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची व पीक सडण्याची शक्यता असते.


हेही वाचा:


Nashik Rain : नाशिकच्या पुरामुळे आमदारांचीही ओढाताण, दशक्रिया विधीसाठी ट्रॅक्टरने धरली वाट