Anna Hajare on Lokayukta Act: सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) नागपुरात (Nagpur News) सुरू आहे. याच हिवाळी अधिवेशनात (Winter Session) मांडणाऱ्या येणाऱ्या लोकायुक्त विधेयकाचं कायद्यात (Lokayukta Act) रुपांतर झाल्यानंतर भ्रष्टाचाराला (Corruption) आळा बसेल, असा दावा सातत्यानं केला जात आहे. याचसंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी कायद्यातील काही महत्वाच्या तरतुदींची माहिती दिली आहे. माहिती अधिकारात (Right to Information) माहिती घेता येते. तर लोकायुक्त कायद्यानुसार, थेट चौकशी आणि कारवाई करता येईल. लोकायुक्त कायद्यामुळे लोकांना खऱ्या लोकशाहीचा अनुभव येईल व सत्तेचे विकेंद्रीकरण होईल, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. तसेच, आता हे बिल विधीमंडळात ठेवण्यात येणार आहे. हा कायदा झाल्यानंतर राज्यातील भ्रष्टाचाराला आणखी ब्रेक लागेल आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र होऊ शकेल, असा विश्वासही अण्णा हजारेंनी व्यक्त केला आहे.


आंदोलनाचा प्रवास सांगताना अण्णा हजारे म्हणाले की, "भ्रष्टाचार रोखण्यासाठी व्यवस्था परिवर्तन महत्त्वाचं. त्यासाठी 16 ऑगस्ट 2011 रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर जनतेचं मोठं आंदोलन झालं होतं. त्यानंतर वेळोवेळी आंदोलनं झाली. संपूर्ण देशातील जनता या आंदोलनात सहभागी झाली. त्यामुळे 1 जानेवारी 2014 रोजी लोकपाल कायदा झाला. पण लोकपाल हा केंद्रासाठी आहे, ही बाब अनेकांना माहीत नाही. राज्यासाठी लोकायुक्त कायदा महत्त्वाचा आहे. राज्यातील नागरिकांना भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार करता यावी यासाठी राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा असणं महत्त्वाचं होतं. म्हणून आम्ही गेली अनेक वर्ष प्रयत्न करत होतो. काही वेळेला आंदोलनही करावं लागलं."


"30 जानेवारी 2019 ला या विषयावर राज्यातील भाजपा-सेना सरकारच्या विरोधात राळेगणसिद्धी येथे उपोषण झालं. राज्यातील अनेक कार्यकर्त्यांनी तालुका, जिल्हा स्तरावर आंदोलन करून यात सहभाग घेतला. त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी असा कायदा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार एक संयुक्त मसुदा समिती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. त्यात राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सरकारच्या विविध विभागाचे 5 प्रधान सचिव आणि जनतेचे 5 प्रतिनिधी होते. मसुदा समितीचं काम साडेतीन वर्ष चाललं. मधल्या काळात सरकारचे त्याकडे दुर्लक्ष झालं. वेळोवेळी आठवण करून द्यावी लागली, पत्रव्यवहार करावा लागला.", असं अण्णा हजारे म्हणाले. 


अखेर मंत्रीमंडळानं मसुदा समितीचा मसुदा तो मंजूर केला आहे. ही आनंदाची बाब आहे. मसुदा समितीनं एक सुंदर मसुदा तयार केलेला आहे, असंही अण्णा हजारे म्हणाले. त्यानुसार चालू हिवाळी अधिवेशनात हे विधेयक ठेवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. त्याबद्दल मी जनतेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. 


लोकायुक्त कायद्यातील काही महत्त्वाच्या तरतूदी : 



  • लोकायुक्त हा राज्यासाठी आहे. हा कायदा क्रांतीकारक होईल यात शंका नाही.

  • पूर्वीचा लोकायुक्त नामधारी होता. लोक आयुक्ताला कोणतेही अधिकार नव्हते. त्यांना भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करण्याची तरतूद नव्हती. लोक आयुक्त हे मुख्यमंत्र्यांनी निवडलेले होते. त्यांना स्वायत्तता नव्हती.

  • नव्या लोक आयुक्त कायद्यात सर्व कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या चौकशीचे अधिकार आहेत.

  • भ्रष्टाचाराच्या तक्रारीबरोबरच सरकारमधील कुप्रशासन, गैरकारभार आणि दप्तर दिरंगाई या सर्व बाबी लोकायुक्तांच्या कक्षेत येतील. त्यामुळे ते कार्यवाही करू शकतील.

  • हा मसुदा करताना कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांच्या लोकायुक्त कायद्यातील चांगल्या मुद्द्यांचाही विचार करण्यात आला आहे. म्हणून आजपर्यंत ज्या काही मोजक्या राज्यांनी कायदे केले त्यापेक्षा महाराष्ट्र राज्याचा कायदा देशातील इतर राज्यांना अनुकरणीय असा ठरेल.

  • सर्व महानगरपालिका, नगर परिषदा, पंचायत समित्या व जिल्हा परिषदा लोकायुक्तच्या कक्षेत येतील.

  • खोट्या तक्रारी होऊ नयेत म्हणूनही तरतूद करण्यात आली आहे. खोटी तक्रार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे.

  • एकतर्फी कारवाई होऊ नये म्हणून ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे त्यालाही आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी देण्यात येणार आहे.

  • सखोल चौकशीसाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे.

  • लोकायुक्त कायदा हा माहिती अधिकार कायद्याच्या दोन पावले पुढे असणार आहे.

  • माहिती अधिकारात माहिती घेता येते. तर लोकायुक्त कायद्यानुसार थेट चौकशी व कारवाई करता येईल.

  • लोकायुक्त कायद्यामुळे लोकांना खऱ्या लोकशाहीचा अनुभव येईल आणि सत्तेचं विकेंद्रीकरण होईल.