Weather Update news : राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानामध्ये (Temperature) सध्या चढ उतार होत आहे. कुठे थंडी (Cold Weather) तर कुठे ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर (Agriculture Crop) मोठा परिणाम होत आहे. त्यामुळं शेतकरी देखील चिंतेत आहेत. राज्यात विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला आहे. तसेच उत्तर भारतातही तापमानाचा पारा घसरला असून, दिल्लीत 1.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


अकोल्यात थंडीची लाट


अकोला जिल्ह्यात जोराची थंडी पसरली आहे. हुडहुडी वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. या वाढत्या थंडीचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. थंडीबरोबरच अकोला जिल्ह्यात दाट धुक्याची चादर पसरली आहे. दाट धुखे पडल्यामुळं वाहन चालवण्यास अडचण निर्माण होत आहे.


बुलढाण्यात सलग दुसऱ्या दिवशी दाट धुक्याची चादर


बुलढाणा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दाट धुक्याची चादर बघायला मिळत आहे. सकाळी चार वाजल्यापासून जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतुकीला खोळंबा होत आहे. कमी दृष्टी मानता असल्यानं वाहन चालवणं कठीण झाले आहे. सातत्यानं पडणाऱ्या धुक्यामुळं पिकांवर रोगराईची शक्यता बळावली आहे. तसेच या बदलत्या वातावरणाचा पिकांवर देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. 


पुण्यातही गारठा वाढला


पुणे जिल्ह्यात अनेक भागांमध्ये आज सकाळपासून धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे. थंडीमुळं ऊन गायब आहे. वातावरणातील हे बदल अनेक आजारांना आमंत्रण देणारे ठरतायेत. पुण्याबरोबरच सोलापूर, सांगली जिल्ह्यातही तापमानात घट दिसून आली. तापमानाचा पारा घसरल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.


तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज 


गेल्या दोन दिवसांपासून असणाऱ्या काहीशा ढगाळ वातावरणामुळे राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होत असल्याचे दिसून येते. पण तरीही हवेतील गारवा मात्र कायम आहे. सकाळच्या वेळी अनेक भागात धुक्याची चादर पसरल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. दरम्यान, पुणे आणि परिसरासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमानात घट होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. काल मराठवाड्यातील उस्मानाबादमध्ये 10.03 अंश सेल्सिअस अशा सर्वाधिक नीच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर पुण्यात 15.04 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले. येत्या दोन-तीन दिवसांत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून किमान तापमानातही घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.


उत्तर भारतातही पारा घसरला


उत्तर भारतातही गारठा वाढला आहे. देशाची राजधानी दिल्लीतही कडाक्याची थंडी जाणवत आहे. काल रात्री येथील किमान तापमान 1.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळं दिल्लीकर चांगलेच गारठले आहेत. दरम्यान, हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार दाट धुके पडण्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : कोकणात थंडी उशीरा सुरु, आंब्यासह काजू उत्पादक चिंतेत; यंदा हापूस उशिरा मिळणार