Jalna Rain Yellow Alert : मुंबईच्या कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र यांनी दिलेल्या सुचनेनुसार जालना (Jalna) जिल्ह्यात आज (5 जुलै) रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची आणि ताशी 30-40 किमी. प्र. ता. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच, 6 ते 8 जुलै या कालावधीत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. 


मुंबईच्या कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र यांनी जालना जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांना दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले असून, काही सूचना देखील करण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून जालना जिल्ह्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. तर अनेक ठिकाणी अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 



  • मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहु नये. 

  • वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.

  • गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये.

  • वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल-सायकल यांचेपासून दूर रहावे. 

  • मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. 

  • सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या लोंबकळणा-या तारांपासून दूर रहावे. 

  • वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. 

  • अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. 

  • शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवात्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

  • सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.

  • आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथील दुरध्वनी क्र. 02482-223132 या वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केशव नेटके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Crime News : बांध कोरल्यावरून झाला वाद, चुलत्यानेच कुऱ्हाडीने वार करून पुतण्याचा केला घात