Weather Update Today : अरबी समुद्रात (Arebian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या देशात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस या भागात ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, दक्षिणपूर्व बंगाल उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात 14 नोव्हेंबरपासून पावसाचा नवा टप्पा सुरू ( Weather Update ) होण्याची शक्यता आहे. 


बंगालच्या उपसागरावरील दबाव तीव्र होण्याची शक्यता


दरम्यान, 16 नोव्हेंबरच्या सुमारास ते पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकून मध्य आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावरील दबाव तीव्र होण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. बंगालच्या उपसागरातून ईशान्येकडील वारे दक्षिणपूर्व द्वीपकल्पीय भारतावर वाहतात. या हवामानाच्या प्रभावाखाली दक्षिण भारतातील अनेक भागांत पावसाची अपेक्षा आहे.


राज्यात 'या' भागात पावसाची शक्यता


अरबी समुद्रानंतर आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यासह देशातील हवामानावर परिणाम होणार आहे. यामुळे मान्सूनसाठी अनुकूल हवामान तयार होत आहे. परिणामी येत्या काही दिवसात पुन्हा एकदा पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.  मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी भागातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.






राज्यासह देशात अवकाळी पावसाचा जोर वाढणार


भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवड्यात दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.  हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मंगळवारी दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आयएमडी (IMD) नुसार, कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्येकडे सरकले जाईल आणि गुरुवारपर्यंत बंगालच्या उपसागरावर दबाव वाढेल. त्यामुळे अवकाळी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


पुढील पाच दिवसांत हवामान आणखी बदलणार


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आग्नेय द्वीपकल्पात 15 नोव्हेंबरपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीसह गोव्यातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत हवामान आणखी बदलणार आहे.