15 November In History : जगाच्या आणि देशाच्या इतिहासाच्या दृष्टीने 15 नोव्हेंबर हा दिवस अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. आजच्या दिवशी इतिहासात लीग ऑफ नेशन्सची पहिली बैठक पार पडली. तसेच सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आजच्याच दिवशी आदिवासी राज्य असलेल्या झारखंडची स्थापना करण्यात आली.


1920 : लिग ऑफ नेशन्सची पहिली बैठक 


पहिल्या महायुद्धाच्या खाईत युरोप चांगलाच होरपळून निघाला होता. पहिले महायुद्धामध्ये (1914-1918) जवळपास एक कोटी सैनिक आणि लाखो नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे असं आणखी एक महाभयंकर युद्ध होऊ नये अशी सर्वांची इच्छा होती. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या पुढाकाराने 1920 रोजी लीग ऑफ नेशन्सची स्थापना करण्यात आली. या लीग ऑफ नेशन्सची पहिली बैठक 15 नोव्हेंबर 1920 रोजी पार पडली. 


लीग ऑफ़ नेशन्स 1920 ते 1946 दरम्यान अस्तित्वात असणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था होती. स्वित्झरलँडमधील जिनिव्हा येथे या संघटनेचं मुख्यालय होतं. पण याच संस्थेच्या काळात दुसरं महायुद्ध झालं. दुसरं महायुद्ध टाळण्यामध्ये या संस्थेला अपयश आल्याने ही संस्था 1946 साली बंद करण्यात आली. त्या ठिकाणी नंतर संयुक्त राष्ट्रांची स्थापना करण्यात आली. 


1949 : महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे आणि इतरांना फाशीची शिक्षा 


महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसे (Nathuram Godse) आणि नारायण दत्तात्रय आपटे या दोघांना 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. नथूराम गोडसे याने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या केली होती. भारताच्या फाळणीच्या वेळी गांधीजींनी ब्रिटिश भारतातील मुस्लिमांच्या राजकीय मागण्यांना अनुकूलता दर्शवली असं नथूरामचं मत होतं. त्याने नारायण आपटे आणि इतर सहा जणांसोबत गांधीजींच्या हत्येचा कट रचला. मात्र, काही ऐतिहासिक दस्ताऐवजांनुसार, नथुराम गोडसे याने कायम महात्मा गांधी यांच्या राजकारणाचा विरोध केला होता.  1948 पूर्वी महात्मा गांधी यांच्या हत्येचे सात वेळेस प्रयत्न करण्यात आले होते. त्यातील पाच प्रयत्नांची नोंद आहे. 


गांधीजींवर पहिला प्राणघातक हल्ला पुण्यात 25 जून 1934 ला झाला. गांधीजी हरिजन कार्यासाठी देशव्यापी दौरा करत असताना पुण्यात आले होते. त्यावेळी ब्रिटीश सरकारच्या विरोधाला न जुमानता पुणे पालिकेने महात्मा गांधींना मानपत्र द्यायचं ठऱवलं होतं. ते घेण्यासाठी जात असताना गांधींच्या गाडीवर बॉम्ब फेकण्यात आला होता. सुदैवाने त्यावेळी चुकीच्या गाडीवर बाँम्ब फेकला गेला आणि ते बचावले. 


जुलै 1944 मध्ये पाचगणीत नथुराम गोडसेनं महात्मा गांधींच्या हत्येचा दुसरा प्रयत्न केला होता. पाचगणीत आंदोलन करणाऱ्या गटाचा नेता असलेल्या नथुरामला गांधीजींनी चर्चेसाठी बोलावलं होतं. पण तेव्हा चर्चेला जाताना सुरा घेऊन निघालेल्या नथुरामला दोघांनी पकडले. त्यानंतर दोन महिन्यांनी पुन्हा एकदा गांधीजी यांच्या हत्येचा प्रयत्न सेवाग्राम जवळ नथुराम गोडसेकडून करण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले. 20 जानेवारी 1948 ला गांधीजींच्या प्रार्थना सभेत बाँब फेकण्यात आला होता. त्यानंतर 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. 


महात्मा गांधी यांच्या हत्ये प्रकरणी नारायण आपटे, मदनलाल पहावा, गोपाळ गोडसे, विष्णू करकरे, दिगंबर बडगे, दत्तात्रय परचुरे, शंकर किश्तय्या आणि विनायक सावरकर हे आरोपी होती. यातील दिगंबर बडगे हा माफिचा साक्षीदार झाला. तर, सावरकरांविरोधात सबळ पुरावा नसल्याने त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली.  


एक वर्षभर चाललेल्या खटल्यानंतर, गोडसेला 8 नोव्हेंबर 1949 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. गांधींचे पुत्र मणिलाल गांधी आणि रामदास गांधी यांनी त्याला सोडून देण्यात यावं अशी मागणी केली होती. परंतु त्यावेळचे भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल आणि गव्हर्नर-जनरल सी. राजगोपालाचारी यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती.


1982 : भूदानचे प्रणेते विनोबा भावे यांचं निधन 


थोर गांधीवादी आचार्य आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे (Vinoba Bhave) यांचं आजच्या दिवशी म्हणजे 15 नोव्हेंबर 1982 रोजी निधन झालं. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे हे विनोबा भावे यांचे मूळ गाव. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली. महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा असलेल्या विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. या चळवळीचा प्रारंभ आंध्र प्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून झाला. यात त्यांनी श्रीमंत शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा काही हिस्सा भूमीहिन, गरीब लोकांना दान करण्याचे आवाहन केले. हळूहळू भूदान चळवळीची व्यापकता वाढत गेली. आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, ओरिसा आणि महाराष्ट्रात या चळवळीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.



1989 :  सचिन तेंडूलकर आणि वकार युनूस यांचे क्रिकेटमध्ये पदार्पण 


सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आजच्याच दिवशी म्हणजे 15 नोव्हेंबर 1989 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने आपला पहिला सामना पाकिस्तानमधील कराची येथे खेळला. त्यावेळी सचिनचे वय अवघे 16 वर्ष 205 दिवस होते. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या वकार युनिसचा हा पहिलाच सामना होता.  त्या सामन्यात त्याने वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादीर यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सपहिल्या सामन्यात वकार युनूसने त्याला 15 धावांवर त्रिफळाचित केले.


सन 2003 सालच्या विश्वचषकात सचिन तेंडूलकर हा मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. 2011 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. 20 नोव्हेंबर 2009 रोजी त्याने कारकिर्दीतील 30 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला.


इतर महत्त्वाच्या घटना : 


1706 : सहावे दलाई लामा यांचे निधन.
1875 : झारखंड मधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा जन्म. 
1927 : आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक उस्ताद युनुस हुसेन खाँ यांचा जन्म.
1929 : कवयित्री शिरीष पै यांचा जन्म.
1948 : कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक सुहास शिरवळकर यांचा जन्म.
2000 : झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.