नवी दिल्ली/अहमदनगर : पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या नितीन आगे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. नितीन आगेची हत्या तर झालीच आहे, मात्र साक्षीदार फुटल्यामुळे आरोपी सुटले, याविरोधात हायकोर्टात जाऊ, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.


नितीन आगेच्या हत्येनंतर 26 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र त्यापैकी 14 साक्षीदार फुटले. त्यामुळे न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात सामाजिक संघटना आणि दलित संघटनांनी आवाज उठवला होता.

काय आहे नितीन आगे हत्या प्रकरण?

राज्यात खळबळ उडालेल्या खर्ड्याच्या नितीन आगे हत्या प्रकरणी नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्यांची सुटका केली. तर अल्पवयीन तिघांची यापूर्वीच सुटका झाली होती.  एकाचा सुनावणी दरम्यान मृत्यू झालाय. या खटल्यात तब्बल 26 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र न्यायालयात 14 साक्षीदारांना फितूर जाहीर केलं होतं.

28 एप्रिल 2014 रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा गावात नितीन राजू आगेची हत्या झाली होती. नितीन न्यू इंग्लिश स्कूलमधे बारावीला शिकत होता. प्रेमप्रकरणाच्या वादातून नितीनला आरोपींनी शाळेत मारहाण केली होती. मारहाण करतच आरोपींच्या विटभट्टीवर नेऊन बेदम मारहाण केली. त्यानंतर  लिंबाच्या झाडाला नितीनला गळफास दिला होता.

या प्रकरणी सचिन गोलेकरसह 13 जणांवर गुन्हा दाखल झाला. यापैकी 3 अल्पवयीन होते, तर एकाचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला होता. हत्येनंतर राज्यात दलित संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. या घटनेने राज्य ढवळून निघालं होतं.  त्यानंतर नोव्हेंबर 2016 पासून सुनावणीला सुरुवात झाली. या दरम्यान 26 साक्षीदार तपासले. यापैकी 14 साक्षीदार फितूर झाले होते.

या खटल्यात  नितीनचे वडिल राजू आणि आईचीही साक्ष नोंदवली. आरोपींविरुध्द पुरावे सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरवलं. सामाजिक संघटना आणि दलित संघटनांनी आवाज उठवला होता.