नागपूर : आपला पक्ष मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट असा आहे. मीडियाच्या भरवशावर चालणारा आपला पक्ष नाही. वुई आर नॉट पेपर टायगर्स. मात्र काही आहेत पेपर टायगर्स, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांवर टीका केली.


कुणाचंही नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी काही नेते फक्त वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून आणून स्वतःला मोठे नेते समजतात, असं टीकास्त्र सोडलं.  ते नागपुरात पूर्व विदर्भातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना खरे टायगर्स, असं संबोधलं. तुम्ही जनतेत जाऊन काम करणारे लोकं आहात.. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आपल्या कामाबद्दल भ्रम पसरवण्याचं काम करत आहे. मात्र, भाजप कार्यकर्त्यांनी तर्कशुद्ध माहितीच्या आधारे त्या भ्रम पसरवण्याच्या प्रयत्नांना उत्तर द्यावं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

एवढंच नाही, तर स्वामिनाथन आयोगाचा अहवाल नऊ वर्षे थंड बस्त्यात ठेवल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. तत्कालिन कृषीमंत्री शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. स्वामिनाथन समितीचा अहवाल 2005 मध्ये येऊनही तेव्हा मनमोहन सिंह, शरद पवार यांसारखे नेते गप्प बसले आणि आता तेच नेते शेतकऱ्यांचे कैवारी बनून आंदोलन करत असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा देण्याची हिंमत मोदींनी दाखवली आणि त्यासाठी सरकारी तिजोरीतून हजारो कोटी देऊ केले, हे सत्य लोकांपर्यंत पोहोचवा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं.

विरोधी ऐक्याची खिल्ली

सध्या देशभर विरोधी पक्षांच्या ऐक्याची चर्चा आहे. मात्र, त्याचे कोणतेही परिणाम भाजपवर होणार नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी ऐक्याची खिल्ली उडवली.

देवेगौडांनी नागपुरात प्रचार केला किंवा मुलायम सिंह यांनी धुळ्यात, तर ममता बॅनर्जी यांनी नंदुरबारमध्ये प्रचार केला किंवा शरद पवार यांनी नागालँडमध्ये जाऊन प्रचार केला तर 50 माणसंही त्यांच्या पक्षाला मतं देतील का, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारला.

हे सर्व नेते आपापल्या क्षेत्राचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे फार तर राज्याचे नेते आहेत. 'आसेतु हिमाचल' असा प्रभाव असलेला आणि सर्वांना मान्य असलेलं नेतृत्व सध्याच्या घडीला फक्त भाजपकडे आहे. नरेंद्र मोदी यांना संपूर्ण भारतात मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे आणि 2019 ची लोकसभा निवडणूक आपणच जिंकू, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.