सातारा : दुष्काळग्रस्त कर्नाटकच्या मदतीला महाराष्ट्र धावून गेला आहे. कोयना धरणातून कर्नाटकला एक टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. कर्नाटकातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे.


 
कर्नाटकात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने कृष्णा नदीच्या पात्रातून राजापूर बंधाऱ्यात 1 टीएमसी पाणी सोडण्यात येईल. राजापूर बंधाऱ्यापासून कर्नाटकातील कृष्णा नदीचे पात्र गेले दोन महिने कोरडे पडले आहे. कर्नाटकातील नदीकाठच्या गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जमखंडीजवळ हिप्परगी धरणातील पाणीसाठाही संपला आहे. त्यामुळे कर्नाटक शासनाने फेब्रुवारीपासून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली.

 
राज्य शासनाने कर्नाटकसाठी एक टीएमसी पाणी सोडण्यास परवानगी दिली आहे. त्याबदल्यात कर्नाटकातील सिंचन योजनेतून जत आणि अक्कलकोट येथे कालव्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 
कोयना धरणात 32 आणि वारणा धरणात 15 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे केवळ पिण्यासाठी कर्नाटकाला पाणी देण्यात येणार आहे. या पाण्याचा शेतीसाठी वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 
कर्नाटकला एक टीएमसी पाणी पोहोचण्यासाठी वारणा-कोयना धरणांसह वेगवेगळ्या धरणांतून 1.33 टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. मात्र मेअखेर पर्यंत दुष्काळी परिस्थिती राहिल्यास महाराष्ट्राला फटका बसण्याची शक्यता आहे.