गॅस सबसिडी सोडण्यात महाराष्ट्र अव्वल !
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2016 02:32 AM (IST)
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरज नसेल त्यांनी एलपीजी गॅसवरील सबसिडी सोडण्याचं आवाहन केल्यानंतर, देशभरातील 1 कोटी लोकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 16 लाख 42 हजार लोकांनी एलपीजी गॅसचं अनुदान न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. गरिबांना संवयंपाकाचा गॅस मिळावा यासाठी देशातील सधन नागरिकांनी गॅस सबसिडी घेऊ नये, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. त्याला अनेक नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. यामध्ये मंत्र्यांपासून ते विरोधी पक्षातील नेत्यांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने ‘गिव इट अप’ अभियान सुरू केलं आहे. बिग बी अमिताभ बच्चन या अभियानाचा भाग आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला देशभरातील जनतेसोबतच महाराष्ट्रातील जनतेनंही मोठा प्रतिसाद दिल्याचं दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 27 मार्च 2015 रोजी गॅस सबसिडी सोडण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहानला सुमारे 1 कोटी नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचं समोर आलं आहे.