मुंबई : मुंबईकर आणि पुणेकरांच्या घशाला कोरड पाडणारी बातमी समोर आली आहे. मुंबईसोबतच पुण्यालाही पाणीपुरवाठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे दोन्ही शहरातील नागरिकांना जपून पाणी वापरावं लागणार आहे. राज्यात मान्सून लांबल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये अवघा 88 हजार 743 दशलक्ष लिटर म्हणजेच 6.13 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 2018 मध्ये आजच्या दिवशी पाणीसाठा 2 लाख 15 हजार 157 दशलक्ष लिटर म्हणजे 14.87 टक्के होता.

आता पालिकेने राखीव पाणीसाठा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हा पाणीसाठी पुरेल, असा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. मुंबई आणि परिसरात पावसाने अद्याप जोर धरलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई पालिकेने केलं आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील एकूण पाणीसाठा

अप्पर वैतरणा--0

मोडक सागर-- 48 हजार 471 दशलक्ष लिटर

तानसा-- 6 हजार 188 दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा-- 24 हजार 295 दशलक्ष लिटर

भातसा-- 6 हजार 437 दशलक्ष लिटर

विहार --1 हजार 354 दशलक्ष लिटर

तुलसी--1 हजार 998 दशलक्ष लिटर



पुण्यातही पाणीबाणी

जूनचा दुसरा आठवडा उलटल्यानंतरही पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणाची पाणी पातळी खालावलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.18 टक्के पाणीसाठा कमी आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये केवळ 9. 68 टक्के म्हणजेच 2.82 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

गेल्या वर्षी याच दरम्यान या चार धरणांमध्ये 10.86 टक्के म्हणजेच 3. 16 टीएमसी एवढा पाणीसाठा होता. धरण क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यास पुण्यात पाणीटंचाईचं संकट निर्माण होईल.

पुण्यातील धरणांमधील पाणीसाठा

खडकवासला
25.95 टक्के

पानशेत
14.40 टक्के

वरसगाव
6.00 टक्के

टेमघर
0 टक्के