नाशिक : मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. जलसिंचन विभागाने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला याबाबत पत्र लिहून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. पण या निर्णयाविरोधात नाशिकचे लोकप्रतिनिधी कोर्टात गेल्यामुळे पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.


औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ असलेल्या जायकवाडी धरणाचा साठा कमी झाल्यामुळे समन्यायी वाटपाप्रमाणे पाणी द्यावं, असे आदेश जलप्राधिकरणने दिले आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यातही दुष्काळ आहे, अशी भूमिका नाशिकच्या आणि नगरच्या काही लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. शिवाय वरच्या धरणक्षेत्रातील शेतकऱ्यांचाही याला विरोध आहे.

जलसिंचन विभागाच्या निर्णयानुसार, आजपासून पाण्याच्या प्रवाह मार्गातील सर्व बंधारे मोकळे केले जाणार आहेत. यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. शिवाय या मार्गातील वीज पुरवठाही खंडित केला जाईल आणि मग सर्व तयारी झाल्यानंतर वरच्या धरणातून पाणी सोडलं जाईल. याची नेमकी वेळ निश्चित करण्यात आलेली नाही.

जायकवाडीतील पाणी पिण्यासाठी राखीव

जायकवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरील धरणातील पाणी आल्यास आणि किती पाणी येते त्याचा विचार केल्यावरच शेतीला पाणी देण्याबाबत विचार होणार आहे. मात्र सध्या तरी जायकवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी दिली आहे.

औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद शहर आणि एमआयडीसी, जालना शहर आणि एमआयडीसी, परळी औष्णिक विद्युत केंद्राला देखील जायकवाडी धरणातून पाणी जाते.

नगरच्या शेतकऱ्यांचा विरोध

''यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर पशुधन वाचविण्याचं मोठं संकट शेतकऱ्यांसमोर आहे. अशा परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा कुठलाही विचार न करता जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय,'' असा आरोप करत नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निर्णयाविरोधात आंदोलनाची तयारी केली आहे.

''जायकवाडी धरणात सध्या भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वेळी मृत साठ्यातून आठ टीएमसी पाणीसाठा वापरला गेला, तर मग यावर्षी इकडची गंभीरता लक्षात न घेता केवळ कायद्याचा आधार घेऊन निर्णय घेणे अन्यायकारक आहे,'' असं मत संगमनेर साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव कानवडे यांनी व्यक्त केलं आहे.

''यावर्षी जिल्ह्यातील मोठी धरणं सोडली तर अनेक छोटी धरणं रिकामी आहेत. मात्र या कोणत्याही गोष्टीचा अभ्यास केला गेला नाही. केवळ नगर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे हे ध्यान्यात ठेवून चार टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला,'' असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

एकूण किती पाणी सोडणार?

जायकवाडी धरणामध्ये विविध धरणांमधून पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मुळामधून 54 दलघमी 1.90 टीएमसी, प्रवरामधून 109  दलघमी 3.85 टीएमसी, गंगापूर धरणातून 17 दलघमी 0.60 टीएमसी, दारणा धरणातून 57.50 दलघमी 2.04 टीएमसी, पालखेड समुहातून 170 दलघमी 60 टीएमसी असं एकूण 254 दलघमी (8.99 टीएमसी) पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोणत्या नियमाने मिळणार जायकवाडी धरणात पाणी?

राज्यातील जलसंपत्तीचे विनियमन करण्याकरिता जलसंपत्तीचे कुशल, समन्यायी आणि टिकाऊ व्यवस्थापन वाटप आणि वापर करण्याकरिता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम 2005 पारित करण्यात आला. राज्यातील भूपृष्ठावरील, भूगर्भातील पाणी वापराचं नियमन करणे, जलसंपत्तीचे कायदेशीर, समन्यायी आणि शाश्वत व्यवस्थान वाटप करणे, पाणी वापरासाठी दर निश्चित करणे आणि पाणी वापराचे हक्क प्रदान करणे यासाठी हा कायदा आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण यांच्या नियमानुसार समन्यायी पाणी वाटप हा कायदा करण्यात आलाय. त्यानुसार प्रत्येक धरणात पावसाळा संपल्यावर किती पाणीसाठा असावा याचा निर्णय घेण्यात येतो.

2011-12 ला मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी पहिल्यांदा समन्यायी पाणी वाटप प्रश्न ऐरणीवर आला आणि वाद सुरू झाला. मराठवाडा जनता विकास परिषदेने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी याचिका दाखल केली. त्यावेळी कोर्टाच्या आदेशाने पाणी सोडण्यात आलं. यावर्षी पाऊस कमी झाल्याने मराठवाड्यात पुन्हा एकदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पण वरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांचा विरोध आहे.

नगर, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा आजचा पाणीसाठा

गंगापूर  88.67 %

दारणा   92.97%

मुकणे  73.09%

भंडारदरा  93.16 %

निळवंडे  85.59 %

मुळा 66.62%

करंजवन 93.89%

जायकवाडी धरण आज 36.62% टक्के पाणीसाठा आहे.