सोलापूर : सोलापूर शहरात पाणी पुरवठा योग्य पद्धतीने करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे स्मार्ट सिटीअंतर्गत विविध उपाय योजना सुरु आहेत. याचाच भाग म्हणून शहरात वॉटर ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. अनेक वर्ष जुनी पाईपलाईन, त्यामधून होणारी गळती, पाण्याची होणारी चोरी या कारणांमुळे सोलापूरकरांना नेहमीच पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. पावसाळ्यात मुबलक पाणीसाठा असताना देखील दररोज पाणी पुरवठा करता येऊ शकत नाही. मात्र यावर उपाय म्हणून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उजनीपासून 110 एमएलडीची नवीन पाईपलाईन टाकली जात आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूरकरांना दररोज पाणी मिळणे शक्य होणार आहे.


सोलापुरात कोण किती पाणी वापरतं, कुठे अवैध नळाचे कनेक्शन आहेत, जुन्या पाईपलाईनमुळे होणारी पाण्याची गळती यामुळे पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करताना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. यासगळ्याची माहिती मिळण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत वॉटर ऑडिट करण्यात येणार आहे. यामुळे कोणत्या परिसराला किती दाबाने पाणी द्यावे लागेल याची देखील माहिती मिळणे शक्य होणार आहे. वॉटर ऑडिट झाल्यानंतर मिळालेल्या अहवालानुसार प्रत्येक नळ कनेक्शनला मीटर देखील बसवण्यात येणार आहेत. यामुळे पाण्याच्या वापरावर नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकणार आहे.


वॉटर ऑ़डिट करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत टेंडर काढण्यात आले असून आठवडाभरात त्याचे टेंडर निघतील. ऑडिटसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. वॉटर ऑडिटचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात एबीडी एरियामध्ये स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. वर्षभरात संपूर्ण शहरात अशा पद्धतीने नळ कनेक्शनसाठी मीटर लावण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.


दरम्यान सोलापुरात उजनीपासून जुन्या पाईपलाईनमधून 80 एमएलडी, नदीद्वारे 108 एमएलडी आणि हिप्परगा तलावातून 27 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मात्र बाष्पीभवन आणि जुन्या पाईपलाईनला लागलेल्या गळतीमुळे प्रत्यक्षात 158 एमएलडीच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे शहरवासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. मात्र नवीन 110 एमएलडीची पाईपलाईन आणि शहरातंर्गत पाणी पुरवठाच्या योजना व्यवस्थित आखली गेली तर शहरवासियांनी होणाऱ्या पाणीटंचाईपासून मुक्तता मिळण्यात मोठी मदत होणार आहे.