वाशिम : 32 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार करुन तिला जाळून मारल्याची घटना समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील मोठेगावमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती असून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे.


पतीशी पटत नसल्यामुळे पीडिता दोन मुलांसह गेली 10 वर्ष वडिलांसोबत राहत होती. 9 फेब्रुवारीला शेतातील तूर काढण्याचं काम सुरु होतं. मात्र त्यादिवशी काही कामानिमित्त विवाहितेचे वडील आणि घरातील इतर मंडळी परगावी गेली होती.

ही संधी साधून आरोपी रणजीत देशमुख, देवीदास देशमुख आणि इतर पाच जणांनी तिच्यावर अत्याचार करुन तिला पेटवून दिल्याचा आरोप महिलेच्या वडिलांनी केला आहे.

विशेष म्हणजे पीडितेनं पोलिसांना दिलेल्या जबाबात अंगावर दिवा पडून आपण भाजल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर गावातील टोळक्यानं आपला विनयभंग झाल्याचा जबाब दिला. त्यानंतर तिच्या वडिलांनी मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केल्यानं खळबळ उडाली आहे.