बडोले, खोतांचं दुर्लक्ष, वाशिमच्या शेतकऱ्याची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 08 Dec 2017 11:29 PM (IST)
ज्ञानेश्वर मिसाळ यांनी सदाभाऊ खोत यांना भेटून व्यथा मांडण्यासाठी मुंबई गाठली. मात्र एका वृद्ध शेतकऱ्याच्या दुःखावर फुंकर मारण्याऐवजी त्यांनी मिसाळ यांची कैफियत हसण्यावारी उडवून दिली.
वाशिम : ही बातमी वाचून, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा का देऊ नये, असा प्रश्न तुम्हालाही पडेल. कारण याच मंत्र्यांच्या हेटाळणीमुळे एका वृद्ध कास्तकऱ्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. निसर्गानं पाठ दाखवली, तर मंत्र्यांनी परिस्थितीची कुचेष्टा केली. अखेर हतबल झालेल्या वृद्ध शेतकऱ्यानं मृत्यूलाच कवटाळलं. वाशिमच्या मानोरा तालुक्यातल्या सोयजना गावात राहणाऱ्या ज्ञानेश्वर मिसाळ यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मिसाळ यांनी स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या बेगडी मंत्र्यांचा पर्दाफाश केला. ज्ञानेश्वर मिसाळ यांच्या 8 एकर शेतात गेल्या 4 वर्षांपासून काहीच उगवलं नाही. त्यांनी राज्य कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांना भेटून व्यथा मांडण्यासाठी मुंबई गाठली. मात्र एका वृद्ध शेतकऱ्याच्या दुःखावर फुंकर मारण्याऐवजी, सदाभाऊ खोतांनी मिसाळ यांची कैफियत हसण्यावारी उडवून दिली.