वर्धा : वर्ध्यात नवविवाहित दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराच्या मागील बाजूला असलेल्या विहिरीत दोघांचेही मृतदेह आढळले. किरकोळ वादातून दोघांनी आयुष्य संपवल्याचा संशय व्यक्त होत आहे.


आशिष सुरेंद्र दुबे आणि सीमा आशिष दुबे अशी नवविवाहितांची नावं आहेत. आशिष आणि सीमाचा प्रेमविवाह झाला होता. दोघंही म्हसाळा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या भोयर लेआऊटमध्ये भाड्याच्या घरात राहत होते.

वडील आजारी असल्यानं दोघेही गाडगेनगरमध्ये आशिषच्या घरी गेले होते. रात्री वाद झाल्यानं दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

रात्रीच्या वेळी विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आल्यानं शेजाऱ्यांना जाग आली. त्यांनी विहिरीकडे धाव घेतली त्यावेळी दोघांचेही मृतदेह विहिरीत आढळले. सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला आहे.