पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि पूरग्रस्तांना मदत वाढवून द्यावी, आदित्य ठाकरेंची मागणी
एबीपी माझा वेब टीम | 21 Aug 2019 05:50 PM (IST)
पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी त्याचबरोबर पूरग्रस्तांना वाढीव मदत मिळायला पाहिजे, अशी मागणी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
सांगली : पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी त्याचबरोबर पूरग्रस्तांना वाढीव मदत मिळायला पाहिजे, अशी मागणी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करत पूरग्रस्तांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी हरिपूर येथे ही मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची आज पाहणी केली. अंकली, हरिपूर सांगलीसह जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागात जाऊन आदित्य ठाकरे यांनी पुराचा आढावा घेतला. हरिपूर येथे आदित्य ठाकरे यांनी हळदीच्या पेवांची आणि नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. आदित्य ठाकरे म्हणाले की, सांगली जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. शेतीसोबतच सामान्य जनतेचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. त्याचबरोबर पूरग्रस्तांना वाढीव मदतही मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी मी मांडणार आहे. आदित्य म्हणाले की, पूरग्रस्तांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन औषधोपचार घ्यावे. पूरग्रस्तांना जर मदत मिळत नसेल, तर ही बाब त्यांनी शिवसेनेच्या निदर्शनास आणून द्यावी, शिवसेनेच्या माध्यमातून मदत पोहोचवली जाईल.