Santosh Deshmukh Murder Case : अवघ्या राज्याला हादरवून सोडणार्‍या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात 80 दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रामधून वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून सिद्ध झालं आहे. त्यामुळे वाल्मीक कराड भोवती आता कारवाईचा फास पूर्णतः आवळला गेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र एबीपी माझाच्या हाती लागलं असून यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी म्हणून वार्मिक वाल्मीक कराडचा उल्लेख करण्यात आला आहे. 



संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे 


या आरोप पत्रामध्ये विष्णू साठे दोन नंबरचा आरोपी आहे. संतोष देशमुख यांची हत्या ही पूर्णतः खड्णी वादामधून झाल्याचे आरोपपत्रातून सिद्ध झालं आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती आणि या खंडणीनंतर झालेल्या वादामध्ये संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. 29 नोव्हेंबर रोजी सुदर्शनच्या फोनवरूनच वाल्मीक कराडने खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर सहा डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे याच्याशी वाद झाला होता. ही माहिती आता पाच गोपनीय साक्षीदारांच्या बाबानंतर कराडविरुद्ध पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये वाल्मीक कराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचे स्पष्ट झालं आहे. गेल्या प्रत्येक दिवसांपासून खंडणी ॲट्रॉसिटी आणि हत्या या प्रकरणावरून अवघा महाराष्ट्रात राज्याचे राजकारण ढवळून निघालं आहे. त्यामुळे आरोपपत्रामध्ये तिन्ही घटनांचा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा सीआयडीच्या हाती लागला आहे. 


आरोपींमध्ये चार्जशीटमध्ये कोणाचा कितवा नंबर


वाल्मिक कराड - एक नंबर
विष्णू चाटे- दोन नंबर
सुदर्शन घुले - तीन नंबर
प्रतीक घुले - चार नंबर
सुधीर सांगळे - पाच नंबर
महेश केदार - सहा नंबर
जयराम चाटे - सात नंबर
फरार कृष्णा आंधळे - आठ नंबर


9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या 


एसआयटी प्रमुख बसवराज तेली, तपास अधिकारी किरण पाटील तसेच खंडणी प्रकरणाचे तपास अधिकारी अनिल गुजर पाटील यांनी बीडच्या न्यायालयामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणाचे चार्जशीट दाखल केलं आहे. यावेळी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते.गेल्यावर्षी 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची डोणगाव टोलनाक्यावरून अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत नऊपैकी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. मागील 80 दिवसांत सीआयडी तसेच एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासानंतर हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत होते. परंतु, दुसरीकडे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आपला तपास वेगाने पूर्ण करत दोषारोपपत्र दाखल केले आहे. आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहणार आहे. दरम्यान 80  दिवसांच्या आत हे प्रकरण न्यायालयात दाखल झाल्याने आता आरोपींना जामीन सुद्धा मिळणे कठीण होणार आहे. या सर्व प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


सुरेश धस, मनोज जरांगे पाटील, दमानियांकडून पाठपुरावा


संतोष देशमुख प्रकरणांमध्ये सर्वाधिक आवाज भाजप आमदार सुरेश धस यांनी उठवला होता. मराठा आंदोनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेक धक्कादायक उलघडा करत वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले होते. वाल्मीक कराड हा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय आहे. बीड जिल्ह्यामधील दहशत सातत्याने अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी समोर आणली होती. देशमुख कुटुंबीयांकडून सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार हा वाल्मीक कराड असल्याचे सातत्याने सांगितलं आहे.  खंडणीसाठीच हत्या झाल्याचं सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला होता. आता पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामधून ही बाब सिद्ध झाली आहे. 


आता प्रमुख सूत्रधार कराड निघाल्याने धनंजय मुंडे यांच्या सुद्धा अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत पुरावे मिळणार नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात कारवाई केली जाणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आली होती. आता प्रमुख आरोपी निघाल्याने धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणती कारवाई केली जाणार? याकडे सुद्धा लक्ष असेल.