पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी देवाच्या चरणी भरभरुन दान दिल्याने तिजोरी तुडुंब भरली आहे. यात्रा काळात तब्बल 2 कोटी 90 लाख 44 हजार 651 रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. शिवाय सोने-चांदीच्या दागिन्यांची मोजदाद होणं अजूनही बाकी आहे.


गरिबांचा लोकदेव म्हणून ओळख असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी यंदा विक्रमी गर्दी झाली होती. राज्यभर मराठा आरक्षणाचे सावट असूनही जवळपास 15 लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेसाठी आले होते. यात्रेच्या 15 दिवसांच्या काळात तब्बल 7 लाख भाविकांनी देवाच्या पायावर दर्शन घेतले, तर 11 लाख लक्ष भाविकांनी देवाचे मुखदर्शन घेतल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.



आषाढी पौर्णिमा झाल्यावर देवच्या हुंडीपेट्या, देणगी केंद्रे, लाडू विक्रीसह सर्व ठिकाणच्या रकमेची मोजदाद करणं सुरु होतं. आज याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यंदा गेल्या वर्षीपेक्षा तब्बल 23 लाखांनी देवाच्या उत्पन्नात वाढ झाली असून भाविकांनी 1 कोटी 60 लाख रुपयांची देणगी दिली आहे. विठुरायाच्या लाडू प्रसादातून 50 लाखाचं उत्पन्न मिळालं असून देवाच्या पायावर 36 लाखांची दक्षिणा वाहण्यात आली.

देवाला वाहिलेल्या सोने-चांदी दागिन्यांची आता मोजदाद सुरु झाली, असून येत्या दोन दिवसात याचीही माहिती जाहीर केली जाणार आहे.