बीड : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) आज अनंतात विलिन झाले. त्यांच्या पार्थिवाला आज अग्नी देण्यात आला आणि एका संघर्षाचा शेवट झाला. विनायक मेटे यांचे बीडमधील शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं. विनायक मेटे यांचं रविवारी एका अपघातात निधन झालं होते. त्यांना अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते.


विनायक मेटें अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये काल रात्री आणण्यात आलं आहे. त्यानंतर ते बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अंत्यदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात आणण्यात आलं. तिथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलं. 


दरम्यान, विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावेळी उपस्थित होते. तसेच यावेळी अनेक मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. विनायक मेटे यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी झाली होती. 


अपघाताच्या चौकशीची मागणी
विनायक मेटे यांचं पार्थिव काल मुंबईतून काल दुपारी 3 वाजता पार्थिव एअर अॅम्ब्युलन्सनं बीडला नेण्यात आले. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीडमध्ये आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मेटे यांच्या निधनानंतर सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान मेटे यांच्या अपघातानंतर या अपघाताची चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली. मेंदूला मार लागल्यानं जागेवरच मेटे यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं, असं काल डॉक्टरांनी सांगितलं. हा अपघात नेमका कसा झाला याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. 


कोण होते विनायक मेटे? 
विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी होते. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार होते. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य होते.