मुंबई : देशासाठी संविधान आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान महत्वाचा आहे, हाच महाराष्ट्राचा स्वाभिमान या सरकारने गहाण ठेवला असून तो परत आणायचा आहे असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र परत मिळवायाचा आहे, म्हणून आगामी निवडणुकीत महाराष्ट्राचा स्वाभिमान हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे असंही ते म्हणाले. राज्य विधीमंडळाचे अधिवेशन (Maharashtra Vidhansabha Session) गुरुवारपासून सुरू होत असून सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
हे सरकार शेतकरी विरोधी असून राज्यातले उद्योग यांनी गुजरातला पळवले, त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्र कधीही झुकला नाही आणि झुकणारही नाही असंही ते म्हणाले.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
- उद्यापासून अधिवेशनाला सुरवात होत आहे. आज शाहू महाराज यांची जयंती आहे त्यांना मी अभिवादन करतो. शाहू महाराज हे सामाजिक समतेचे जनक मानले जातात.
- महायुती सरकारने या राज्याला खड्यात घातलं. यांच्या फुगलेल्या छातीची हवा काढण्याचं काम मतदारांनी केलं आहे, त्यांचं आभार मानतो. 45 प्लसची वल्गना केली त्यानंतर त्यांची महाराष्ट्राने अवस्था पाहिली.
- दोन वर्षांपूर्वी लोकशाहीचा गळा घोटला आणि बेकायदेशीर सरकार आलं.त्यानंतर लोकांनी त्यांची जागा दाखवली
- दडपशाहीने सरकार चालवता येत नाही आणि जनता त्यांच्या पाठीशी कधीही उभी राहणार नाही हा संदेश दिला.
- हे विश्वासघातकी हे सरकार आहे.
- उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा मोदी सरकारने केली. मात्र ही जुमलेबाजी आहे.
- शेतकऱ्यांना फसवण्याचे काम या महापापी महायुतीने केलं आहे.
- मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.
- सोयाबीनला 5100 रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी केली, मात्र मिळाले काय?
- खते बियाणे शेती अवजारे याच्यावरती 30 ते 35 टक्के आणि मजुरीमध्ये ही वाढ झाली.
- शेतकऱ्यांचं अवजारे, बियाणे, खते यावर मोठ्या प्रमाणावरती टॅक्स आणि हेलिकॉप्टर डायमंड खरेदी करताना दोन-तीन टक्के लावले जातात.
- अंत्यविधीच्या साहित्यावर 18 टक्के टॅक्स लावलेला आहे. त्यामुळे मरणही महाग केलं आहे.
- युरिया खताची वाढ दीडशे रुपयांनी केली, 50 किलोची बॅग 40 किलोंची केली.
- सरकार भंगार आणि एसटी महामंडळाच्या गाड्याही भंगार झाल्यात.
- मुलांना या भंगारगाड्यातून प्रवास करावा लागत आहे.
- मंत्र्यांनी गुंडांच्या टोळ्या निर्माण केल्या आहेत, डग्ज माफिया आहेत.
- यांनी महाराष्ट्र विकून खालाय. अशा सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
ही बातमी वाचा :