अकोला : सत्तेत असू किंवा विरोधात पण आम्ही नेहमी शेतकऱ्यांसोबत आहोत, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शिवसेनेच्या विदर्भातल्या शिवसंपर्क अभियानाला कालपासून अकोल्यातून सरूवात झाली. आज याच अभियानाअंतर्गत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची भेट घेतली.


शेतकऱ्याच्या बाजूने बोललो की राजकारण करतो असं वाटतं. आजवर शेतकरी बोललाय का? ज्याच्यासाठी आम्ही बोलतो, पण आता त्या शेतकऱ्याने स्वत: बोलायला हवं, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना केलं.

शिवसंपर्क अभियानाचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे अकोल्यात दाखल झाले आहेत. दरम्यान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी अनुपस्थिती लावली आहे. शिवाय शिवसेनेचे मंत्री, आमदार , खासदार आणि इतर पदाधिकारी अकोल्यात दाखल झाले आहेत.

या दौऱ्यादरम्यान अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यात असणाऱ्या 20 मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्याचसोबत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मतं जाणून घेतली जातील. या अभियानाचा शेवट 19 तारखेला नाशिकमध्ये होणार आहे.

नाशिकला 19 मे रोजी शेतकरी मेळावा घेण्यात येईल. त्याच दिवशी एक नवी योजना आणली जाणार आहे. त्या दिवशी शेतकरीही शिवसेनेच्या मंचावरुन बोलतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘’सरकारमधील जल दरोडेखोर शोधून काढू’’

या सरकारमध्ये असणारे जल दरोडेखोर कोण आहेत, ते आम्ही शोधून काढू. जलयुक्त शिवारमध्ये घोटाळे होणार असतील, तर आधीच्या सरकारचा सिंचन घोटाळा आणि यामध्ये काय फरक, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.