जालना : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मी कासव व्हायला तयार आहे, पण मी धरणात लघुशंका करणारा अजित पवार होणार नाही, अशा शब्दात ठाकरेंनी अजित पवार यांचा समाचार घेतला. ते जालन्यात बोलत होते.


शिवसेनेच्या वाघाची शेळी,गांडूळ आणि आता कासव झाला असून शिवसेना आता मान आत घालून बसली आहे. त्यामुळे शिवसेना आता काहीच करु शकत नाही, अशी बोचरी टीका अजित पवारांनी काल शनिवारी हल्लाबोल मोर्चाच्या समारोपावेळी औरंगाबादमध्ये केली होती. अजित पवारांच्या या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

मी शेळी,गांडूळ ,ससा,कासव व्हायला तयार आहे मात्र धरणात लघुशंका करणारा अजित पवार व्हायला तयार नाही, तसंच धरणात लघुशंका करणाऱ्या अजित पवारांना कालवा आणि धरणाच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांचा समाचार घेतला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जालना जिल्ह्यातील घनसावंगीमध्ये शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारसह राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

औरंगाबादमध्ये पैठणमधील सभेतही उद्धव यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाचा समाचार घेतला. आधी डल्ला मारणाऱ्यांनी आता हल्ला करु नये, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चावर टीका केली आहे.

मराठवाड्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यानिमित्त ते आज पैठणमध्ये बोलत होते.  पैठणमध्ये शरद सहकारी साखर कारखान्याचा गळित हंगामाचा उद्घाटन कार्यक्रम झाला. आम्ही एकटेच लढणार आणि जिंकणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं. शिवाय 2019 नंतर भाजप सत्तेत राहणार नाही असं सुतोवाचही त्यांनी केलं.