जळगावः आघाडीचं 15 वर्षे सरकार होतं, सोनिया गांधींकडे तुम्ही पाणी भरत होतात, तेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता का आला नाही, असा सवाल करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.


शरद पवारांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राज्यभरात निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांबद्दल आणि आरक्षणाबद्दल चर्चा झाली, असा अंदाज लावला जात आहे. जळगावमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली, त्यामध्ये त्यांनी पवारांवर टीका केली.

मराठा मूक मोर्चांमुळे महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन सुरु आहे. अत्यंत शांतपणाने सुरु असणाऱ्या या मोर्चांमधून मराठा आरक्षणाची मागणीही केली जात आहे. यासंदर्भातच शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. त्यामुळे पवारांच्या चर्चेनंतर संसदेत या मुद्द्यावर चर्चा होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.