नागपूर : शेतकऱ्यांच्या 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून ही कर्जमाफी करण्यात येणार आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे थकीत कर्ज माफ करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.


बदलतं हवामान, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे या त्रासातून शेतकऱ्याला मुक्ती देण्यासाठी शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात केली. मार्च 2020 पासून याची अमलबजावणी करण्यात येणार आहे. जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांच्यासाठीही चांगली योजना आम्ही राबवणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. कर्जमाफीची योजना पारदर्शकपणे राबवली जाणार असून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहे. कोणत्याही अटीशर्ती विना ही कर्जमाफी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विरोधकांचा सभात्याग -
उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरसकट कर्जमाफीचं वचन दिलं होतं, मग आता दोन लाखापर्यंत कर्जमाफी का दिली? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग केला.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं - राजू शेट्टी
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. हे आश्वासन दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीने पूर्ण होणार नाही. यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत 2019 पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय हा वास्तविक पाहता बरोबर नाही. कारण राज्यात दुष्काळ त्यानंतर नापिकी, महापूर, ओला दुष्काळाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस आणि महापुरामुळे ज्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्या पिकांवर काढलेल्या पीककर्जाची मुदत 30 जून 2020 आहे. त्यामुळं थकबाकी जाण्याचा विषयच नव्हता. त्यामुळे ज्या पिकांचं नुकसान झालं आहे, त्या पिकांना ना कर्जमाफी मिळाली ना फायदा मिळाला. त्यामुळं त्यांचं नुकसान झालं, बर्बाद झाले ते वंचित राहिले. नेमकी ही कर्जमाफी कुणाला मिळणार हा प्रश्न आहे. याबाबत आकडेवारी तपासावी लागेल. यात किती लाभधारक बसतात. पण नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जर असेल तर ते शेतकरी या योजनेत बसणारच नाहीत.

हेही वाचा - राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Loan Waiver | शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार : मुख्यमंत्री | ABP Majha