मुंबई : नाणार प्रकल्प कोकणात काही होत नाही, आम्ही तो घालवला आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच, नाणार प्रकल्पाची विदर्भाला खरी गरज असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.


भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नाणार प्रकल्पासंदर्भात दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली.

प्रकल्प विदर्भात व्हावा, हा आशिष देशमुख यांचा प्रस्ताव अभ्यासपूर्ण आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्यांचं कौतुक केले. तसेच, विदर्भाला रोजगाराची गरज असल्याचेही ते म्हणाले.

नाणारसारख्या प्रकल्पामुळे एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत आणि विदर्भाला त्याची गरज आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, विदर्भात केवळ पोकळ अधिवेशन घेऊन काही होणार नसून, काही चांगले निर्णयही मुंबईत बसून घेतले जाऊ शकतात, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.