Uddhav Thackeray on Raj Thackeray : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर मेळावा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे राज्यात राज ठाकरे महायुतीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी आज महायुतीचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सभा घेणार आहेत की नाहीत याबाबत अजूनही त्यांनी निर्णय घेतलेला नाही. याबाबत पुढे निर्णय घेऊन सांगू असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये राज ठाकरे प्रचार करणार असल्याचे जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.


कौतुक करतो की काही जण...


या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले असता, उद्धव ठाकरे यांनी अवघ्या एका वाक्यामध्येच राज ठाकरे यांचा बिनशर्त पाठिंब्याचा विषय माफक शब्दामध्ये संपवला. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर बोलताना सांगितले की, यांचं कौतुक करतो की काही जण बिनशर्त पाठिंबा देतात, तर काहीजण लढण्याचे नाटक करून पाठिंबा देत आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर प्रतिक्रिया देतानाच प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये सामील होतील, अशी चर्चा होती. मात्र, आता ती चर्चा फिस्कटली असून वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे रिंगणात उतरली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि वंचितची आघाडी झाली होती ती सुद्धा या लोकसभेच्या जागावाटपाच्या दरम्यान बिनसल्याने तुटली गेली आहे.


वाजपेयी यांनी सुद्धा संमिश्र सरकार चालवलं


उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदी यांच्यावरही घणाघाती हल्ला चढवला. त्यांनी सांगितले की, आता थेट हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशीच लढत होणार असून एकाधिकारशाही देशाला घातक आहे. पुन्हा हुकुमशहाला पुन्हा स्वीकारणं घातक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्याला वाटतं संमिश्र सरकार नको, पण इतिहास पाहिला तर वाजपेयी यांनी सुद्धा संमिश्र सरकार चांगल्या प्रकारे चालवलं होतं असं त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सरकार चालवलं. संमिश्र सरकारच्या काळामध्ये देशाची प्रगती झाली. त्यामुळे आपल्याला देश मजबूत हवा असेल तर सरकार संमिक्ष असावं, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.


त्यांचा फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नाही


महाविकास आघाडीच्या एकत्रित सभांवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की लवकरच आम्ही महाविकास आघाडीच्या सभा सुरू करणार आहोत. महायुतीच्या सभा जरी सुरू झाल्या असल्या तरी त्यांचा फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नाही, असा टोला त्यांनी लागावला. उमेदवारांचा पत्ता नाही आणि सभा होत आहेत, याला काही अर्थ नसल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या सुद्धा एकत्रित सभा होतील, आम्ही एकत्रितपणे प्रचार करणार आहोत, जागावाटप झालं आहे. प्रत्येक पक्षांना आपल्या कार्यकर्त्यांना सामावण्याची गरज असल्याने सांगत त्यांनी सांगलीच्या जागेवर अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसला सल्ला दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या