मुंबई : महाराष्ट्रात युतीचंच सरकार येणार असं विधान करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे. विशेष म्हणजे उद्धव यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. कलम 370 रद्द केल्याबद्दल मोदींचं कौतुक करताना उद्धव ठाकरेंनी राम मंदिर आणि समान नागरी कायदा मंजूर करण्याची आठवणही करून दिली.


पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन आज मुंबईत करण्यात आले. मेट्रोच्या तीन मार्गिकांचं भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रामदास आठवले आदी उपस्थित  होते. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते.

यावेळी  उद्धव ठाकरे यांनी 370 हटविल्याबद्दल मोदी यांचे आभार मानले.  मोदीजींचा मला अभिमान वाटतो, असे म्हणत ते अयोध्येत राम मंदिर देखील तुम्ही बांधाल हा विश्वास आहे असे म्हणाले.

दरम्यान ठाकरे यांनी येणारं सरकार युतीचं येणार आहे, असे म्हणताच देवेंद्र फडणवीस यांनी जोराने टाळ्या वाजवल्या. यावेळी ठाकरे म्हणाले की, जे करायचं ते खुलेपणाने, दिलखुलासपणे करायचं आहे. आम्हाला सत्ता हवी आहे, सत्तेची हाव नाही. राज्याचा विकास करण्यासाठी सत्ता हवी आहे.

एक चांगलं आणि मजबूत सरकार आणायचं आहे, असे ठाकरे म्हणाले. दरम्यान आम्ही अनेक चांगल्या गोष्टी करतो आहोत, त्याला मोदींजींची चांगली साथ मिळत आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांचा लहान भाऊ असा उल्लेख केला त्याला ठाकरे यांनी हसून दाद दिली.



गणेशोत्सवाच्या वेळी जलप्रदूषण न करण्याचा संकल्प करा, पंतप्रधान मोदींचे आवाहन

गणेश विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण करू नका. आपल्याला संकल्प करायचा आहे की विसर्जनानंतर समुद्रातील घाण साफ करू. समुद्र आणि मिठी नदी प्लास्टिकमुक्त करू. प्रदूषण वाढवणारा गणेशउत्सव आपल्याला करायचा नाही, विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण करू नका, प्लास्टिकमुक्त विसर्जन करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी त्यांनी एक भारतीय- एक संकल्प करण्याचे देखील आवाहन केले.

यावेळी ते म्हणाले की, मी रशियात होतो तरी मुंबईचा पाऊस आणि पाण्याच्या स्थितीबाबत अपडेट घेत होतो. यावेळी इसरोच्या वैज्ञानिकांचं कौतुक करताना ते म्हणाले की, आव्हानांचा सामना करत पुढे जाणारे लोकच मोठे होतात.  मिशन चांद्रयानमध्ये एक अडथळा आला आहे. मात्र आपले बहादूर वैमानिक हटणार नाहीत, चंद्रावर पोहोचायचं स्वप्न पूर्ण होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की,  गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर हजारो करोड रुपयांच्या योजनांचा श्रीगणेशा होत आहे. 20 हजार कोटींहून अधिक रुपयांचे काम आज सुरु होत आहे याचा आनंद आहे. हे सर्व प्रकल्प मुंबईच्या विकासासाठी महत्वपूर्व साध्य होतील. कमी वेळात मुंबईत प्रवास होईल. मुंबईच्या वेगाने देशाला वेग दिला आहे, असेही ते म्हणाले.

फडणवीस सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी  खूप प्रयत्न केलेत ते मी स्वतः पाहिलेत. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील प्रकल्पांवर वेगाने काम केलं आहे, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले.

आगामी काळात आधुनिक पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी रुपये खर्च करणार आहोत. देशभरात मोबिलिटी, ट्रान्सपोर्टला मजबूत करण्यावर जोर दिला जात आहे. आज ज्या वेगाने काम होत आहे तसे  आधी कधीच झाले नाही, असेही मोदी म्हणाले.