जालना :  औरंगाबाद लोकसभेमध्ये झालेला पराभव फक्त चंद्रकांत खैरेंचा झालेला नाही. तर तो माझा म्हणजे उद्धव ठाकरेंचा पराभव झालाय, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पण आम्ही पराभवाने शांत बसणारे नाहीत. आम्ही पुन्हा एकदा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते जालना येथे दुष्काळी दौऱ्यावर आले असताना बोलत होते.


चंद्रकांत खैरे तुम्ही काळजी करू नका, पुढचा विजय आपला आहे, असा विश्वास ठाकरे यांनी खैरेंना यावेळी दिला.

लोकसभा निकाल लागल्यानंतर सामनाच्या अग्रलेखातून देखील,  ‘…तर संभाजीनगरवर हिरवं फडकं कधीच फडकलं नसतं’, अशी जहरी टीका आणि पराभवाची खंत व्यक्त केली होती. मी पराभव पाहण्याच्या अगोदर मेलो का नाही, असं वक्तव्य माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काल केलं होतं.

संभ्रम होता की नेमके कोणाचे सरकार येणार? मात्र मी आत्मविश्वासाने सांगत होतो. मागच्या वेळी पेक्षा काकणभर यश मिळेल हे सांगितले होते. माझ्यावर निवडणुकीअगोदर टीका झाली, मी टीकाकारांना घाबरत नाही, असेही ठाकरे म्हणाले.

दुष्काळ पुढच्या पिढीला पाहू देणार नाही, तो कायमचा संपवून टाकू. कर्जासाठी ज्या बँका शेतकऱ्यांची अडवणूक करत असतील त्यांना कोणत्याही मार्गाने सरळ करा हे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. आता  जर त्यांनी काही नाही केले तर शिवसेना आपल्या पद्धतीने पाहून घेईल, असेही ठाकरे म्हणाले.  जो शेतकऱ्यांना आडवेल त्याला शिवसैनिक सरळ करेल, असे ते म्हणाले.

दुष्काळ दौऱ्यात उद्धव ठाकरेंकडून विकासकामांचे उद्घाटन, कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवून स्वागत