मुंबई : शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाने सत्तेत असूनही सत्तेचा वापर केला नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.


मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर शाखाप्रमुख आणि विभागप्रमुखांशी संवाद साधला.

"मुख्यमंत्री पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे राज्यात फिरले. त्यांचे नेतेही राज्यभर फिरले. प्रचाराला फक्त पंतप्रधानच यायचे बाकी होते.", असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांची कानउघडणी केली. ते म्हणाले, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाने सत्तेत असूनही सत्तेचा वापर केला नाही."

पक्ष सोडून जाणाऱ्यांवर उद्धव ठाकरेंनी तोफ डागली. "द्राक्षांची घडातच किंमत जास्त असते. सुट्टी द्राक्षे स्वस्त मिळतात. त्यामुळे आपल्याला सोडून गेलेल्यांची आता काही किंमत नाही हे लक्षात ठेवा.", असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी, मुंबई महापालिकेत युती होवो ना होवो शिवसेनेचा भगवाच महापालिकेवर फडकणारच, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.