मुंबई : कर्जमाफीची घोषणा म्हणजे फक्त निवडणूक जुमले नाहीत, हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दाखवून दिले. उत्तर प्रदेशसारख्या देशातील सगळ्यात मोठ्या राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होऊ शकते, तर मग कृषिप्रधान महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यांनी मागे का राहावे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊन देशातील दबललेल्या, पिचलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्यातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल योगी आदित्यनाथ यांचं उद्धव ठाकरे यांनी अभिनंदनही केलं.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत, असा सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, या आत्महत्या नापिकी, अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींबरोबरच कर्जबाजारीपणामुळेही होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, हीच शिवसेनेची मागणी आहे.