यवतमाळ : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर अखेर राज्यातला सत्तापेच सुटला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केले आहे. परंतु उद्धव ठाकरे हे निवडून आलेले आमदार नाहीत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधीमंडळाचे (विधानपरिषद किंवा विधानसभा) सदस्यपद मिळवणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवरून आमदार होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यासाठी ते यवतमाळ विधानपरिषदेमधून निवडणूक लढतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


यवतमाळ जिल्ह्यावर शिवसेनेची चांगलीच पकड आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ मतदारसंघात तशी चाचपणी सुरु केली आहे. यापूर्वी शिवसेना नेते तानाजी सावंत हे यवतमाळ विधान परिषदेचे सदस्य होते. आता ते उस्मानाबाद जिल्ह्यातून भूम-परांडा विधानसभेवरुन आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे ही जागा आता रिकामी झाली आहे. परिणामी उद्धव यांनी यवतमाळ विधानपरिषदेमधून निवडणूक लढवावी, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु आहे.

यवतमाळ मतदारसंघात एकूण 439 मतदार आहेत. मागील वेळी येथून शिवसेनेचे तानाजी सावंत यांना 378 मतं मिळाली होती. तनाजी सावंत यांनी ही जागा जिंकल्यामुळे या जागेवर शिवसेनेचा भगवा फडकला होता. हा मतदारसंघ सुरक्षित असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथून उभे राहावे, असा सल्ला शिवसेना नेत्यांनी दिला आहे. तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचीदेखील हिच मागणी आहे.

उद्धव ठाकरे यवतमाळमधून विधानपरिषदेवर निवडून गेले तर विदर्भातील लोकांना आनंद होईल. तसेच ते थेट विदर्भाशी जोडले जातील. अशा चर्चादेखील शिवसेनेच्या विदर्भातील नेत्यांमध्ये सुरु आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला | ABP Majha



जगेन असं वाटत नव्हतं पण सर्वांच्या आशीर्वादाने मंत्री झालो : छगन भुजबळ | ABP Majha