मुंबई : मुंबई महापालिकेतील महापौरपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील बेळगाव विमानतळावर समोरासमोर आले. मात्र उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांशी बोलणं टाळलं आणि केवळ स्मितहास्य करत नमस्कारावर निभावून नेलं.


उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाहून कोल्हापुरातून परतत होते, तर चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवेंच्या लग्नावरुन औरंगाबादहून परतले होते.

चंद्रकांत पाटील विमानतळावर प्रतीक्षेत थांबले होते. त्यावेळी दोघं अनपेक्षितपणे समोरासमोर आले. मात्र कुठलीही चर्चा न करता उद्धव ठाकरे यांनी फक्त हसून हात जोडून केला नमस्कार केला. त्यानंतर ते शिवसेनेच्या इतर मंत्र्यांसह मुंबईच्या दिशेने विमानाने रवाना झाले, अशी माहिती आहे.

शिवसेना सोबत न आल्यास भाजपला सर्व पर्याय खुले : गडकरी


चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरुन संपर्क करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर बेळगाव विमानतळावर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट होऊन चर्चा होईल अशी अपेक्षा भाजपच्या गोटात होती, मात्र दोघांमधील दरी मिटवण्याची संधी शिवसेनेनं टाळली. त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय, याबाबत भाजप नेत्यांमध्ये संभ्रम आहे.

रावसाहेब दानवेंनी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या एक दिवस आधी (22 फेब्रुवारी) ‘मातोश्री’वर  जाऊन उद्धव ठाकरेंना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं होतं.युतीसाठी सकारात्मक असल्याचे कुठलेच संकेत देण्याच्या मूडमध्ये शिवसेना नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नाकडे पाठ फिरवल्याचं म्हटलं जात आहे.

रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नाचा शाही थाट, लाखो रुपयांची उधळण


दरम्यान, मुंबईमधील महापौरपदाची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. कारण उद्या होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजप शिवसेनेसोबत चर्चा करु शकते. एबीपी माझाच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे.

मुंबईमध्ये कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

...म्हणून उद्धव ठाकरे दानवेंच्या मुलाच्या लग्नाला जाणार नाहीत!