पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुस्तक वादाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च अभिमानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करणारं एक पुस्तक दिल्ली भाजपच्या कार्यालयात नुकतेच प्रकाशित करण्यात आले होते. त्यावरून वादंग उठला होता. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी शिवरायांचे वंशज असणाऱ्या कोल्हापूर आणि साताऱ्याच्या गादीच्या वारसदारांनी स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि भाजपतून राजीनामे देण्याची मागणीही राऊतांनी केली होती. यावर बोलताना उदयनराजेंनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर ताशेरे ओढले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आली आहे, या मुद्यावर उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, महाराजांशी तुलना करणं अत्यंत चुकीचं आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का का?, असा प्रश्न अनेकदा पडतो, असंही बोलताना ते म्हणाले. काल जे पुस्तक प्रकाशित झालं, ते ऐकून अत्यंत वाईट वाटलं. नरेंद्र मोदींची छत्रपती शिवरायांशी करणं अत्यंत चुकीचं आहे. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. तसेच जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजचं, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. तसेच आरक्षणा सारखे विषय पेंडिंग का ठेवले? याचं जाणते राजे म्हणवणाऱ्यांनी उत्तर द्यावे, असंही ते म्हणाले.


शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत उदयनराजे म्हणाले की, 'एक युगपुरुष जन्माला येतो, ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. ज्यांना ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारलं होतं का? शिवसेना भवनामध्ये  शिवाजी महाराजाच्या वरती बाळासाहेबांचा फोटो का?' असं सवाल करत त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. शिवसेनेने नाव बदलून ठाकरेसेना करावं. नाव बदलल्यानंतर राज्यातील किती तरुण तुमच्यासोबत राहतात हे मला पहायचं आहे, असं आव्हान यावेळी उदयनराजेंनी दिलं आहे. 'सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे विसर पडणे हीच यांची लायकी, शिववडा असं नाव ठेवता तेव्हा आदर कुठे जातो. वडापावला महाराजांचं नाव कसं काय दिलं जाऊ शकतं?' असं म्हणत उदयनराजेंनी थेट विचारणा केली आहे.


उदयनराजे म्हणाले की, 'भोसले घराण्यात आम्ही जन्माला आलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. टिका करणाऱ्यांपेक्षा आम्ही नक्कीच जास्त पुण्य केलं आहे, म्हणूनच या घराण्यात आमचा जन्म झाला आहे. तरिही मी कधीच नावाचा दुरुपयोग केला नाही. तसेच पुढे बोलताना त्यांनी थेट महाशिवआघाडीवर निशाणा साधला आहे. 'महाराजांच्या नावाचं आजपर्यंत फक्त राजकारण करण्यात आलं आहे. महाशिवआघाडीतून शिव का काढलं?' असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.


उदयनराजेंकडून घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत तीन पत्रकं वाटण्यात आली. पहिल्या पत्रकात शिवाजी महाराजांच्या वेषातील व्यक्ती रामराजे नाईक निंबाळकर यांना मुजरा करतानाचा फोटो आहे. दुसऱ्या पत्रकात जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर शिवाजी महाराजांच्या नावाचा दुरुपयोग केल्याबद्दल केलेल्या टिकेची पोस्ट आहे. तर तिसऱ्या पोस्टरमध्ये शिवसेना भवनचा फोटो आहे. ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वरती आहे, तर शिवाजी महाराजांचा खाली आहे.


Majha Vishesh | छत्रपती शिवरायांशी पंतप्रधान मोदींची तुलना का? माझा विशेष | ABP Majha


दरम्यान, गेल्या साडेतीनशे वर्षांपासून महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च अभिमानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करणारं एक पुस्तक दिल्ली भाजपच्या कार्यालयात नुकतेच प्रकाशित करण्यात आले होते. 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन सुरू झालेल्या वादावर भाजपने अखेर पडदा टाकला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही. भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले असून हा वाद आता संपला आहे, असं ट्विट करुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकानंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होवू शकत नाही, असंही प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


Goyal vs Awhad | वादग्रस्त पुस्तकावरुन लेखक जयभगवान गोयल आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात खडाजंगी | ABP Majha