सांगलीः सांगलीतील मराठा मोर्चाला जाताना अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तासगाव तालुक्यातील वायफळे येथून सांगलीत जाताना गिरगाव नजिक ओव्हरटेक करताना टायर फुटून गाडीचा अपघात झाला.


राज्यभरात ठिकठिकाणी विराट मोर्चे काढल्यानंतर मराठा समाजाने आज सांगलीतही असाच भव्य मोर्चा काढला. क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून या मोर्चाला सुरुवात झाली. तिथून कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघाला.


पतंगराव कदम, जयंत पाटील, आर.आर.पाटील यांचे कुटुंबिय देखील या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाचं वैशिष्ठ्य म्हणजे म्हणजे या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी यावं, मात्र मोर्चादरम्यान माध्यमांशी बोलू नये, अशी अट आयोजकांनी घातली आहे. मोर्चावेळी बंदोबस्त म्हणून 1800 पोलीस कर्मचारी, 750 होमगार्ड, एसआरपीएफच्या 4 तुकड्या असा चोख बंदोबस्त सांगलीत तैनात केला होता.