नागपूर/भिवंडी : गेल्या 24 तासात राज्यात खड्ड्यांमुळे दोघांचा बळी गेला आहे. आज सकाळी नागपुरातील खड्ड्यांमुळे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर भिवंडीमध्ये खड्ड्यात दुचाकी आदळून 16 वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला.


नागपुरच्या हिंगणा एमआयडीसी परिसरातील एक महिला आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरुन जात होती. यावेळी खड्ड्यात दुचाकीने उसळी घेतल्याने त्या महिलेचा 12 वर्षीय मुलगा रितेश मसराम खाली पडला. यावेळी मागून येणाऱ्या बसने त्याला चिरडलं. या घटनेत रितेशची आई जखमी झाली आहे.

दुसरीकडे, भिवंडीतील भादवडमध्ये खड्ड्यामुळे दहावीमध्ये शिकणाऱ्या धीरज जामकरचा मृत्यू झाला आहे. धीरज दुचाकीवरुन क्लासला निघाला होता, यावेळी त्याची गाडी खड्ड्यात आदळली. त्यातच मागून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिल्याने धीरजचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालघरमधील खड्ड्यांमुळे एका प्रसिद्ध महिला बाईक रायडरचा मृत्यू झाला होता. जागृती होगाळे असं मृत बुलेटस्वार बाईक रायडरचं नाव होतं.

जागृती होगाळे या गृहिणी असल्या, तरी मुंबईमध्ये बाईकरनी नावाच्या ग्रुपची सक्रीया सदस्य होत्या. जागृती होगाळे ज्या महिलांना बाईक रायडिंगची आवड आहे, अशा महिलांची मोट बांधून त्यांनी मोठमोठ्या मोहिमा आखल्या होत्या.

धक्कादायक बाब म्हणजे, जागृती होगाळेंच्या मृत्यूपूर्वी पालघर जिल्ह्यातल्या खड्ड्यांनी 4 चालकांचा जीव घेतला आहे. त्यानंतरही झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

महिलांना बळ देणाऱ्या लेडी रायडरचा खड्ड्यामुळे करुण अंत