मुंबई : पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणत राज्यभरातील सार्वजनिक गणपतींना आज निरोप दिला जात आहे. मुंबईत पोलीस आणि महापालिकेकडून गणपती विसर्जनासाठी चौपाट्या सज्ज करण्यात आल्या आहेत. मुंबईत तब्बल 40 हजार पोलीस विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात करण्यात आले आहेत. मुंबईत शंभर ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. तसंच अनेक रस्त्यांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे तर काही रस्त्यांवरची वाहतूक वळवण्यात येणार आहे.


राज्यभरातील गणपती मिरवणुकीतील दहा महत्त्वाचे मुद्दे :

मुंबई : मुंबईतील विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा राजा येथून होते.

मुंबई : लालबागच्या राजाच्या विसर्जनानंतर मुंबईतील विसर्जन मिरवणुका संपतात

पुणे : पुण्यात मानाच्या कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक सर्वात अगोदर सुरु होते.

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संध्याकाळनंतर मार्गस्थ होतो

कोल्हापूर : कोल्हापुरात मानाचा पहिला गणपती तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीच्या आरतीने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

नाशिक : गोदाप्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेतर्फे मूर्ती संकलन व्यवस्था उभारण्यात आली आहे. नाशिककर दरवर्षी या ठिकाणी मूर्ती दान करतात. गेल्या वर्षी 2 लाख 71 हजार मूर्तींचं संकलन करण्यात आलं होतं.

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर शहरातील इतर गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते.

औरंगाबाद : विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी पोलीस ड्रोनचा वापर करणार आहेत. काही संशयास्पद आढळल्यास पोलिसांकडून मिरची पूडचा वापर केला जाणार आहे.

जळगाव - गणेश विसर्जन मिरवणूक, महाराणा प्रताप मंडळाकडून तलवारबाजी, दानपट्टा, यांसारखी थरारक प्रात्यक्षिकं सादर केली जाणार

धुळे - विसर्जनासाठी निघालेल्या गणरायाच्या पालखीवर मशिदीतुन पुष्पवृष्टी केली जाणार, मशिदीतून आरती आणून मुस्लीम गणरायाची आरती करतात, ब्रिटीश काळापासून सुरू असलेली ही परंपरा याही वर्षी अबाधित राहणार