मुंबई : वंचित बहुजन आघाडी हा पक्ष समाजातील वंचित घटकांना सत्तेपासून दूर ठेवणारा आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत असताना आठवले यांनी वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला.


राज्यात कोणता नेता विरोधकाची भूमिका चांगल्या पद्धतीने निभावू शकतो? या सवालावर उत्तर देताना आठवले म्हणाले की, राज्यात प्रभावी विरोधक नाही. मात्र प्रकाश आंबेडकर हे माझे विरोधक आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहेत. असेही आठवले यांनी सांगितले.

रामदास आठवले यावेळी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला महायुतीत किमान 10 जागा मिळाव्या, यासाठी प्रयत्न करत होतो. परंतु काही तडजोडीनंतर आम्हाला पाच जागांवर समाधान मानावे लागले.

आठवले म्हणाले की, महायुतीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन झाले आहे. तसेच रिपब्लिकन पक्ष सत्तेत राहू शकला. त्यामुळे आम्ही काही तडजोडी केल्या आहेत आणि आम्ही एकत्र आहोत. आगामी निवडणुकीत आम्ही (महायुती)किमान 240 ते 245 जागा जिंकू, अशी आशा आहे.