मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या शेडुंग हद्दीत घडलेल्या भीषण अपघातातील बळींचा आकडा 17 वर पोहचला आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू झाला आहे.


 

कदम कुटुंबावर काळाचा घाला


 


या अपघातात मिरारोड मधल्या कदम कुटुंबीयांवर काळाने घाला घातला आहे. अपघातात 4 महिन्यांची नात, सून आणि आजी या तीन महिलांचा मृत्यू झाला. तर कुटुंबप्रमुख कल्याण कदम आणि त्यांचे चुलत भाऊ या अपघातात जखमी झाले आहेत. 28 वर्षीय कल्याण कदम हे मुंबईत चित्रपट निर्माते म्हणून कार्यरत आहेत.

 

 



 

एमडी कॉलेजचे प्रा. कारंडे कालवश


 

भांडुपचे 40 वर्षीय अविनाश कारंडे आपली पत्नी मीनल कारंडे आणि मुली वेदिका आणि आरुषीसह साताऱ्याला गेले होते. मुंबईला परतताना झालेल्या अपघातात अविनाश करंडे यांचा मृत्यु झाला. त्यांच्या पत्नी गंभीर जखमी आहेत. सुदैवाने दोन्ही मुली सुखरुप आहेत. सध्या आई व मुलींवर एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. प्रा. कारंडे हे एमडी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

 

 

प्रा. अविनाश कारंडे पत्नीसह

 

 

कसा घडला अपघात ?


 

पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंक्चर झालेल्या स्वीफ्ट गाडीच्या मदतीला एक इनोव्हा कार थांबली होती. त्यावेळी साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणारी निखिल कंपनीची खासगी बस भरधाव वेगात होती. त्याचवेळी बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या स्विफ्ट आणि इनोव्हा कारला जाऊन धडकली.

 
ही धडक इतकी जोरदार होती की तिन्ही वाहनं बाजूच्या खड्ड्यात जाऊन उलटली. यात दोन्ही कारमधल्या लोकांनी प्रसंगावधान राखत कारमधून उड्या टाकल्या. त्यामुळे कारमधील प्रवाशांचं किरकोळ जखमांवर निभावलं. त्यापैकी फारशी कोणाला गंभीर इजा झालेली नाही.

 

एक्स्प्रेस वे वर ही खाजगी बस साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना बसचालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर या बसची इनोव्हा आणि स्विफ्टला धडक बसली.

 
दुसरीकडे, कारला धडक दिल्यानंतर बसमधल्या 17 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 31 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींवर पनवेल आणि कामोठेमधल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बसमध्ये एकूण 50 ते 55 प्रवासी होते.

 

 

बस साताऱ्याहून येत असल्यामुळे बहुसंख्य प्रवासी हे साताऱ्याचेच होते. तर काही जण ठाणे, घणसोली या भागातील आहेत.