जालना : पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या 3 मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मच्छिन्नद्रनाथ चिंचोली गावात आज 12 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.


या घटनेमुळे अवघ्या गावावर शोककळा पसरली आहे. सोमित्रा सातपुते (वय 12 वर्षे), संगीता रणमळे (वय 15 वर्षे) आणि जना रणमळे (वय 18 वर्षे) असं मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावं आहेत.

मच्छिन्नद्रनाथ चिंचोली गावातील 6 मुली आज सकाळच्या सुमारास गावच्या परिसरातील तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान कपडे धुवून झाल्यानंतर या सहाही मुली पोहण्यासाठी पाण्यात उतरल्या. मात्र यातील एक मुलगी बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर चौघींनी तिला वाचवण्यासाठी तिच्या दिशेने जायला सुरुवात केली. पण तलावात पाणी मोठ्या प्रमाणात असल्यानं तिला वाचवताना तिघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, काठावर आलेल्या मुलींची आरडा-ओरड ऐकल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी या मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने गावकऱ्यांच्या हाती अपयश आलं.