नागपूर : आगामी निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये युती झाली नाही, तर शिवसेनेमध्ये उभी फूट पडेल, असं भाकित केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं. येत्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये युती होईल की नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.


नागपुरात पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिलं. यावेळी युतीवरही त्यांनी हे भाकित केलं.

गेले अनेक वर्ष एकमेकांच्या सोबतच निवडणूक लढवणाऱ्या दोन्ही पक्षांनी युती करावी, अशी अपेक्षा असल्याचंही आठवले म्हणाले. मात्र, जर शिवसेनेने युती करण्याचं नाकारलं तर शिवसेनेचे अनेक आमदार पक्षाची साथ सोडतील, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भाजपसोबत युती करण्याची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा शिवसेनेच्या नेत्यांची असल्याची माहितीही आठवले यांनी दिली.

याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही बोलणं केलं आहे, असं आठवले म्हणाले.

अॅट्रॉसिटी कायद्याला धक्का देण्याचे केंद्र सरकारचे कोणतेही विचार नाहीत. उलट अॅट्रॉसिटी कायद्याला आणखी मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेत असल्याचं आठवले म्हणाले. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना नोकरीच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण कायम रहावं यासाठीही केंद्र सरकार कायद्यात बदल करु शकतं, असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेचा स्वबळाचा नारा

आगामी सर्व निवडणुका शिवेसना स्वबळावर लढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मेळाव्यातूनच जाहीर केलं होतं. शिवाय स्वबळावर निवडणूक लढणार, या निर्णयापासून माघार घेणार नाही, असं म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.