अहमदनगर : महावितरणच्या निष्काळजीपणामुळे अहमदनगरमध्ये गेल्या दोन दिवसात तिघांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या दोन दिवसांत विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात दोन ठिकाणी घडली.


श्रीगोंद्यात रविवारी रामदास (48) आणि शांताराम माने (31) या चुलता पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. लिंपणगावला सायंकाळी शेतात काम करताना ही दुर्दैवी घटना घडली. रामदास हे शेतात जनावरांसाठी ऊस तोडत होते. तर पुतण्या शांताराम हा बांधावरील गवतावर तननाशक मारत होता. त्यावेळी तुटलेल्या विजेच्या तारेवर शांतारामचा पाय पडला.

विजेच्या तारेला चिकटलेल्या पुतण्याला ओढण्यासाठी रामदास धावले. मात्र विजेच्या धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला. रात्री कुटुंबीय शोधायला आल्यावर दोघंही मृत अवस्थेत आढळले.

घोडेगावला विजेच्या खांबावर दुरुस्ती करणाऱ्या राजेंद्र निकमचा मृत्यू झाला. राजेंद्र हा महावितरणकडे आउटसोर्सिंग कामगार होता. सोमवारी सायंकाळी तो गावातील डीपीचा वीजपुरवठा खंडित करुन विजेच्या खांबावर चढला. मात्र सबस्टेशनकडून रिटर्न करंट आल्याने तो धक्क्याने खाली फेकला गेला. तालुक्यात दोन दिवसांत तिघांचा बळी गेल्याने महावितरणचा निष्काळजीपणा समोर आला आहे.