सातारा : पावसाळ्यात चांदोलीचा परिसर बघितल्यावर डोळ्याचं पारणं फिटतं. बघावं तिकडं हिरवाई.. निखळ पाण्याचे झरे.. आणि 100 टक्के शुद्ध हवा.. पण इथली हवाच सांगलीचे एसपी दत्तात्रय शिंदे आणि वनविभागाच्या उपसंचालिका विनिता व्यास यांच्यामधल्या वादाचं कारण ठरली आहे.


चांदोली व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची हत्या करणारी आणि वनसंपत्तीची चोरी करणारी टोळी लपल्याची माहिती सांगली पोलिसांना मिळाली. मग सर्च ऑपरेशनची परवानगी मागणारं पत्र इस्लामपूरच्या डीवायएसपींनी कराडमधील वन विभागाच्या उपसंचालक विनिता व्यास यांना धाडलं. या पत्राला व्यास यांनी केराची टोपली दाखवली.

पोलिसांच्या सर्च ऑपरेशनला वन विभागानं परवानगी नाकारली. तरीही 9 सप्टेंबरला सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे 50 अधिकारी आणि 100 कर्मचाऱ्यांसह चांदोली गेस्ट हाऊसवर पोहोचले. मात्र व्यास बाईंनी त्यांना जंगलात एन्ट्री दिली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगलीचे एसपी दत्तात्रय शिंदेंना चांदोलीचं पर्यटन करायचं होतं. आणि त्यालाच वनविभागाच्या उपसंचालक विनिता व्यास यांचा आक्षेप होता. एसपींनी पर्यटनासाठी शोधलेलं निमित्त त्यांना रुचलं नाही, असं अधिकारी खासगीत सांगतात.

पर्यटनासाठी एसपी दत्तात्रय शिंदे 50 अधिकारी आणि 100 कर्मचाऱ्यांच्या लवाजम्यासह कशाला येतील? हा प्रश्नही उरतोच. माध्यमांना या प्रकरणाची कुणकुण लागल्यानंतर दत्तात्रय शिंदे आणि विनिता व्यास यांनी
मौन बाळगलं आहे. वनविभागाचे अधिकारी व्यास मॅडमची बाजू मांडत आहेत, तर सांगलीचे पोलिस मात्र थंडगार पडले आहेत.

प्रशासनातील दोन अधिकाऱ्यांच्या इगोमुळे सध्या चांदोलीची हवा खराब झालीय, असं म्हणायला हरकत नाही.